एप्रिलमध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. पहिल्या आठवड्यात याची दाहकता कमी होती. पण दुसऱ्या आठवड्यात कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढू लागली. प्रथम शहराच्या भोवती असणारी गावे हॉट स्पॉट बनली. पण एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत जशी वेगाने वाढ झाली, तसा मृतांचा आकडाही वाढू लागला आहे.
एप्रिल महिन्यापासून २ हजार २३५ लोकांना कोरोनाची लागण झाली. यात ५२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. मागील आठवड्यातील मृतांचा आकडा ४३ आहे. यावरून दिवसेंदिवस करवीर तालुका कोरोनाचा हॉट स्पॉट बनत चालला आहे. करवीर तालुक्यातील १०५ गावांत आता कोरोनाने प्रवेश केला आहे.
लॉकडाऊनच्या काळात सकाळी ११ नंतर निर्बंध येत असले तरी, सकाळी खरेदीसाठी कोणत्याही नियमांचे पालन न करता नागरिक रस्त्यावर गर्दी करत आहेत. यामुळे समूह संसर्गाचा धोका वाढू लागला आहे. हॉट स्पॉट गावात करवीर तालुक्यातील पश्चिमेला असणाऱ्या गावाबरोबर शहराजवळच्या गावात रुग्णसंख्या वाढत आहे.
चौकट
सुपरस्प्रेडरवर व कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असून त्यादृष्टीने व्यावसायिक, फेरीवाले, भाजीपाला विक्रेते, किराणा दुकानदार यांची ॲन्टिजेन टेस्ट करण्यासाठी आरोग्य विभाग, ग्रामपंचायत प्रशासनाने बंधनकारक केले आहे. याशिवाय जे रुग्ण कोरोनाबाधित आहेत, त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, घराभोवती निर्जंतुकीकरण, तसेच लॉकडाऊनचे हत्यार उपसले जात आहे.
लसीचा तुुटवठा
४५ वर्षे वयावरील लोकांना लसीकरण मोहीम गतिमान करताना लसीचा तुटवडा व लोकांची नाराजी यामुळे फक्त ४७ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. २९ ठिकाणी लसीकरण सुरू असले तरी, लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण मोहीम मंदावली आहे. त्यातच आता १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा कार्यक्रम जाहीर केल्याने गोंधळात भर पडणार आहे.
१ एप्रिलपासून करवीर तालुक्यातील कोरोना लसीकरण व लेखाजोखा
गावे -- ११८ ,
वाड्या १२
४५ वर्षावरील पात्र - १ लाख ६० हजार
लसीकरण - ८५ हजार.
एकूण टक्केवारी - ४५ टक्के
एप्रिल महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्ण- २ हजार २३५ मृत्यू - ५२