कळंबा : कळंबा पाचगावसह लगतच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या तीव्र झळा पोहोचू लागल्या आहेत. मिळणारे पाणी कमी दाबाने, कमी वेळेपुरते उपलब्ध होत असल्याने दैनंदिन निकडीच्या गरजा भागवण्यासाठी नागरिकांना विहिरी बोअरवेल विकतच्या पाण्याचा टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. या पाण्याचे शुद्धिकरण योग्य प्रमाणात झाले नसल्याने संसर्गजन्य आजार बळावत आहेत.
काही ठिकाणी विहिरी आणि बोअरवेलमध्ये परिसरातील अशुद्ध सांडपाणी मिसळत असल्याने हे पाणी पिण्यासाठी योग्य राहिले नाही. कळंबा तलावातील पाणी लगतच्या ग्रामीण भागासह उपनगरात वितरित केले जाते. परंतु वाढत्या प्रदूषणामुळे पाण्याचा नैसर्गिक रंग बदलून हिरवा पडला आहे शिवाय पाण्याचा उग्र घाण वास येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
बहुतांश ठिकाणी पाणीटंचाईमुळे टँकरचा वापर केला जात असला तरी टँकरमधून मिळणारे पाणीसुद्धा स्वच्छ नसल्याने नागरिकांना उलट्या, हगवण, अंगास आग उठणे, पचनाचे विकार व अन्य आजारांचा सामना करावा लागत आहे.
प्रदूषित पाणी पिल्याने मळमळ उलट्याचा त्रास होत आहे. हेच अशुद्ध पाणी दोन दिवसांपेक्षा जास्त काळ साठवल्यास यात आळ्या आढळून येते आहेत. अशुद्ध पाणी आंघोळ, स्वयंपाक, पिण्यासाठी, कपडे धुण्यासाठी वापरल्याने विविध प्रकारचे त्वचेचे आजार बळावत चालले आहेत. त्यामुळे नागरिकांनी पाणी वापरण्यापूर्वी निर्जंतुकीकरण करून वापरणे क्रमप्राप्त बनले आहे.