मुरगूड : सदाशिवराव मंडलिक यांनी राजकीय वारसदार म्हणून आम्हाला पुढे करावे, विधानसभेसाठी उसना शिवसैनिक आणून आमच्यावर अन्याय करू नये, असे प्रतिपादन ‘आरपीआय’चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी केले.मुरगूड (ता. कागल) येथे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्यावतीने आयोजित मेळाव्यात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. उत्तम कांबळे म्हणाले, जनता आमची, माणसे आमची; पण निवडणुकीत जय दुसऱ्यांचा हे आता चालू देणार नाही. प्रस्थापितांनी सत्तेच्या पोळ्या भाजण्यासाठीच आपल्या समाजाची प्रगती होऊ दिली नाही. मुश्रीफ यांनी फक्त विकासकामांचा कांगावाच केला. त्यांच्या गैरकारभाराचा पाढा कागलच्या गैबी चौकात व मुरगूडच्या तुकाराम चौकात वाचणार आहे. ‘आरपीआय’चे राज्य सचिव मंगलराव माळगे म्हणाले, मुरगूडमध्ये प्रस्थापितच रॅली काढत होते, मेळावे होत होते; पण आज आपल्या कार्यकर्त्यांनी मेळावा यशस्वी केला.प्रा. शहाजी कांबळे म्हणाले, भ्रष्टाचार, महागाई, अत्याचार, आदी बाबींसाठीच शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली.बबलू कांबळे, साहील गोरंबेकर, साताप्पा हेगडे, सीमा व्हनाळीकर, दिलीप कांबळे, रूपाली कांबळे, संजय लोखंडे, शोभा कांबळे, विश्वास सडोलकर, बाबासाहेब कागलकर, बाळासाहेब वाशिकर, विलास भामटे, अनिल माने, शामप्रसाद कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. बी. आर. कांबळे यांनी स्वागत तर नामदेव केनवडेकर यांनी प्रास्ताविक केले. (वार्ताहर)मातोश्रीचे दरवाजे बंद१९९८ ला संजय घाटगे शिवसेनेचे आमदार झाले. पुढील निवडणुकीत खुद्द बाळासाहेबांनी त्यांना सेनेची उमेदवारी दिली; पण ती त्यांनी नाकारली. यामुळेच बाळासाहेबांना यातना देणाऱ्या संजय घाटगे यांना मातोश्रीचे दरवाजे बंद असल्याचे साताप्पा सोनाळकर यांनी सांगितले.
कागलला उसना शिवसैनिक नको
By admin | Updated: August 18, 2014 23:29 IST