एकनाथ पाटील ल्ल कोल्हापूरजिल्ह्याच्या कामकाजातून डोके वर काढण्यासही वेळ मिळत नाही; त्यामुळे दाखल असलेले गुन्हे, फौजदारी स्वरूपाच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांना पोलीस अधीक्षकांच्या कक्षाबाहेर असलेल्या अभ्यागत कक्षामध्ये तासन्तास ताटकळत बसावे लागते. हा आतापर्यंतचा अनुभव इथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला वेगळा नाही; परंतु पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी थेट अभ्यागत कक्षात येऊन, नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांची पूर्तता करण्यासाठी त्यांच्यासमोरच अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत. डॉ. शर्मा यांच्या ‘नो वेटिंग, विश्वास ठेवा, न्याय देण्यासाठीच मी आहे,’ या आपुलकीने इथे येणारा प्रत्येक नागरिक भारावून जात आहे. कोल्हापूर हा गुंतागुंतीचा जिल्हा आहे. येथील एखाद्या सार्वजनिक प्रश्नासंबंधी, जमिनीचे वाद, फसवणुकीसह अन्य तक्रारींमध्ये संबंधित पोलीस ठाण्याकडून टाळाटाळ केली जाते. वशिला आणि गर्भश्रीमंतीपुढे सामान्य लोकांचे काहीच चालत नाही. दहशतीच्या जोरावर त्यांची पिळवणूक केली जाते. असे पीडित लोक अखेर न्याय मिळण्याच्या भावनेने पोलीस मुख्यालयाची पायरी चढतात. पोलीस अधीक्षकांना भेटायचे म्हणजे अंगावर कापरे भरलेले असते. मात्र, अन्यायाने खचून गेलेले लोक मनाची तयारी करूनच याठिकाणी आलेले असतात. पोलीस मुख्यालयात प्रवेश करतानाच महिला कॉन्स्टेबलकडे आपल्या नावाची नोंद करावी लागते. तेथून विचारीत, पायऱ्या चढून दुसऱ्या मजल्यावरील पोलीस अधीक्षकांच्या कक्षामध्ये जावे लागते. याठिकाणी भेटायला येणाऱ्या लोकांसाठी अभ्यागत कक्ष आहे. ठरावीक वेळ त्यांना भेटण्यासाठी ठेवण्यात आली आहे; परंतु ही वेळ माहीत नसल्याने सकाळी दहा ते रात्री सातपर्यंत लोक भेटण्यासाठी येत असतात. पोलीस अधीक्षकांना भेटण्यासाठी त्यांच्या सुरक्षा रक्षकाकडे नावाची चिठ्ठी द्यावी लागते. त्यानंतर तो दहा ते पंधरा मिनिटांनी ती चिठ्ठी तो अधीक्षकांच्या टेबलवर नेऊन ठेवतो. नंबरप्रमाणे नागरिकांना आतमध्ये बोलावून समस्या विचारल्या जातात. एखाद्या प्रसंगी महत्त्वाची बैठक सुरू असेल तर अख्खा दिवस भेटण्यासाठी ताटकळत बसावे लागत असे. हा अनुभव कोल्हापूरच्या जनतेला वेगळा नाही. मात्र पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांनी पदभार स्वीकारल्यापासून आपल्याला भेटायला येणारा प्रत्येक नागरिक निराश होऊन जाणार नाही, याची विशेष काळजी घेत आहेत. नागरिकांना प्रतीक्षा करायला न लावता ते स्वत:च आपल्या कक्षातून उठून अभ्यागत कक्षामध्ये येतात. याठिकाणी प्रत्येक नागरिकाशी संवाद साधून समस्या ऐकून घेतात. प्रत्येक नागरिकाच्या प्रश्नांना सकारात्मक उत्तर देऊन ते मार्गी लावण्यासाठी जाग्यावरूनच ते संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देतात. हा प्रत्यक्ष अनुभव पाहून लोक भारावून जात आहेत. समस्या मार्गी लागली नसली तरी जिव्हाळ्याने विचारपूस करणाऱ्या डॉ. शर्मा यांच्या स्वभाव पाहून, ‘असा अधिकारी आतापर्यंत बघितला नाही,’ अशा प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत.
न्यायासाठी आता थेट भेटा पोलीस अधीक्षकांना
By admin | Updated: January 12, 2015 00:36 IST