लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांचा दिनांक ६ जून रोजी रायगडवर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतो. यापुढे हा दिवस ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून संपूर्ण राज्यात साजरा केला जाणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, रयतेच्या हिताचा कारभार कसा असावा, याचे सर्वोत्तम उदारहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला राज्य कारभार आहे. त्यांनी १७ व्या शतकात महाराष्ट्रात भूमीपुत्रांचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले. या महापुरूषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस ६ जून १६७४, म्हणजे शिवराज्याभिषेक दिन होय. स्वत:च्या सार्वभौम स्वराजाचा पवित्र मंगलकलश जनतेला अर्पण करून रयतेची झोळी सुख, समृध्दीने भरली होती. याच पवित्र दिवशी शिवकालगणनेला प्रारंभ झाला होता. हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याची मागणी विविध स्तरातून करण्यात येत होती. त्यानुसार ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयात हा दिवस ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सकाळी ११ वाजता सर्व पदाधिकारी व कर्मचारी हे गुढी उभारून तिला अभिवादन करतील. महाराष्ट्र गीत, राष्ट्रगीताचे गायन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर होईल. यावेळी कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर उपस्थित होते.
कॅबिनेटचा विषय मुख्यमंत्र्यांच्या विचाराधीन
रायगड येथे राज्याचे कॅबिनेट व्हावे, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांची आहे. हा विषय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विचाराधीन असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.