लोकमत न्यूज नेटवर्क
नवे पारगाव :अत्यल्प मानधनात ग्रामीण भागातील बातमीदार सेवाभावी वृत्ताने काम करतात. उदरनिर्वाहासाठी पत्रकारांनी पत्रकारितेवर अवलंबून न राहता सक्षम पर्याय शोधणे ही काळाची गरज बनली आहे. बदलत्या काळात पत्रकारिता हे उपजीविकेचे साधन ठरू शकत नाही. त्यामुळे पत्रकारांनी अन्य व्यवसाय करत व्यासंग म्हणून पत्रकारिता करावी, असे मत ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी व्यक्त केले.
अतिग्रे (ता. हातकणंगले ) येथील संजय घोडावत विद्यापीठात कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने पत्रकार दिन व उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
बी न्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुल्लाणी, ‘लोकमत’चे ज्येष्ठ पत्रकार समीर देशपांडे , कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे, उपाध्यक्ष अभिजित कुलकर्णी, संजय घोडावत पॉलिटेक्निकचे प्राचार्य विराट गिरी यांची भाषणे झाली.
रवींद्र पाटील संपादित 'जागल्या' स्मरणिकेचे व त्यांच्या 'श्रमिकांचे विश्व' या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. एबीपी माझाचे विजय केसरकर, ‘लोकमत’चे सुहास जाधव, पुढारीचे राजू पाटील, महासत्ताचे व्यवस्थापक चंद्रकांत मिठारी, तरुण भारतचे संतोष सणगर, सकाळचे संजय पाटील यांच्यासह विविध बातमीदारांचे सत्कार संपादक वसंत भोसले यांच्या हस्ते झाले.
यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष अभिजित कुलकर्णी, सचिव सुरेश पाटील, खजानिस सदानंद कुलकर्णी, कौन्सिल मेंबर अतुल मंडपे, प्रा. भास्कर चंदनशिवे, ॲड. प्रशांत पाटील उपस्थित होते.
फोटो ओळी : कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनचे पुरस्कार प्राप्त पत्रकारांच्या सोबत संपादक वसंत भोसले, कार्यकारी संपादक ताज मुल्लाणी, ज्येष्ठ पत्रकार समीर देशपांडे, प्राचार्य विराट गिरी, अध्यक्ष सुधाकर निर्मळे, उपाध्यक्ष अभिजित कुलकर्णी, आदी उपस्थित होते.