कोल्हापूर : महाराष्ट्रातील वाढत्या जातीय आणि सामाजिक अत्याचाराच्या घटनांना रोखण्यासाठी डाव्या परिवर्तनवादी आणि आंबेडकरवादी पक्ष संघटनांतर्फे सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ आणि जाती मुक्ती आंदोलनाची स्थापना करण्यात आली आहे. या आंदोलनातर्फे कोल्हापुरातील मुस्लिम बोर्डिंग येथे गुरुवारी (दि. १९) जातिअंत परिषद आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. पाटणकर म्हणाले, महाराष्ट्रात खैरलांजी, खर्डा, सोनई यासारख्या जातीय अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. आजही आंतरजातीय विवाहाला प्रचंड विरोध होत आहे. जातिव्यवस्थेमुळे होणारे शोषण मान्य होण्यासारखे नाही. त्यामुळे सामाजिक अत्याचाराच्या घटनांना पायबंद बसावा आणि आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना संरक्षण मिळण्यासाठी संरक्षण केंद्रे निर्माण करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात येत आहे. या परिषदेत जातिअंत चळवळीचे मुख्य निमंत्रक अॅड. प्रकाश आंबेडकर, अरविंद देशमुख, प्रतिमा परदेशी, आदी मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेमध्ये महाराष्ट्रातील डाव्या परिवर्तनवादी आणि आंबडेकरवादी चळवळीतील सुमारे सोळा संघटना सहभागी होत आहेत. यापूर्वी लातूर, नागपूर येथे ही परिषद घेण्यात आली आहे. या परिषदांमध्ये आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना वडिलांच्या जातीचा उल्लेख करता येणार नाही, आंतरजातीय विवाह करणाऱ्यांच्या मुलांना जात लावली जाऊ नये, असा कायदा शासनाने करावा, असे ठराव मांडण्यात आले आहेत, अशी माहितीही पाटणकर यांनी दिली.या पत्रकार परिषदेस लाल निशाण पक्षाचे अतुल दिघे, गौतमीपुत्र कांबळे, अनिल म्हमाणे, सुरेखा कांबळे, शिवाजी शिंदे, दिगंबर सकट, आदी उपस्थित होते. ( प्रतिनिधी )चळवळीत इकडे आणि सत्तेत तिकडे, चालणार नाहीपरिवर्तनवादी चळवळीत काम करायचे आणि सत्तेसाठी प्रतिगाम्यांसोबत जायचे, अशी दुटप्पी भूमिका घेणाऱ्यांना या चळवळीत प्रवेश दिला जाणार नाही, असा सूरही या पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला. आर्थिक, सामाजिक, राजकीय, उत्पादन क्षेत्रातही जातिअंतासाठी ठोस कार्यक्रम राबविण्याचा निर्धार जातिअंत परिषद करणार असल्याचे अतुल दिघे यांनी सांगितले.
परिवर्तनवादी संघटनांतर्फे गुरुवारी जातिअंत परिषद
By admin | Updated: March 17, 2015 00:11 IST