कोल्हापूर : ‘लोकमत’च्या ‘ग्लोबल कोल्हापूरकर’ या विशेष पुरवणीच्या माध्यमातून कोल्हापुरातील तरुण मोठ्या प्रमाणात परदेशात नोकरी व व्यवसायासाठी असल्याचे समजले; पण ‘आयटी’चे महत्त्व कोल्हापूरला कधी कळणार, अशी विचारणा ‘कोल्हापूूर संवाद’ या कार्यक्रमात तरुणाईने केली. भ्रष्टाचारमुक्त महापालिका कारभाराबरोबर विविध समस्यांबाबतची गाऱ्हाणीही यावेळी परखडपणे मांडली. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यावतीने सोमवारी शाहू स्मारक भवन येथे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कोल्हापूर संवाद’चे आयोजन केले होते. त्यामध्ये विविध महाविद्यालयांच्या तरुणांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या रुपरेषेबाबत बोलताना संयोजक सतेज पाटील म्हणाले, आगामी महापालिका निवडणुकीचा काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा हा जनतेतून तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात साहित्य, अर्थतज्ज्ञ, ज्येष्ठ नागरिक व महिला यांच्याशी संवाद साधून त्यांच्या महापालिकेकडून कोणत्या अपेक्षा आहेत, हे जाणून घेतले. तरुण हा राजकारणातील महत्त्वाचा घटक असल्याने त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न आहे.कोल्हापुरातच ‘आय.टी.’ पार्क होणे गरजेचे असल्याचे मयूर पाटील (डी. वाय. पाटील अभियांत्रिकी) याने सांगितले. कोल्हापूरकरांना ‘आयटी’चे महत्त्व कधी कळणार, अशी विचारणा भूषण जाधव याने केली. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना उमेदवारी देऊ नका, अशी सूचना आदम शेख (केआयटी कॉलेज), शामल निगवेकर (न्यू कॉलेज) यांनी केली. आर्टस्च्या मुलांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळत नसल्याची खंत कार्तिक पाटील (डी. वाय. पाटील अभियांत्रिकी) व केतन पायमल (दळवीज आर्टस्) यांनी व्यक्त केली. पासपोर्टची व्यवस्था येथे करावी, अशी मागणी ज्योती चव्हाण हिने केली. यावेळी सूरज माळी (शहाजी लॉ कॉलेज), आकाश वाली, सत्यजित कदम, प्रणाली पांडव, वैष्णवी उलपे, अवधूत गायकवाड, वीरेंद्र पाटील, शिवराज जाधव, अक्षय सावंत, गुणभूषण बहारिया, आकाश पुरेकर यांनीही विविध प्रश्न उपस्थित केले. यावेळी प्रतिमा सतेज पाटील, ऋतूराज पाटील उपस्थित होते. उमेदवारांना आचारसंहिता !काँग्रेसकडून उमेदवारी देताना काही आचारसंहिता देणार आहे. नगरसेवक झाल्यानंतर मोबाईल बंद नाही, चोवीस तास नागरिकांच्या संपर्कात, सकाळी तासभर घरात थांबून नागरिकांचे प्रश्न सोडविले पाहिजेत, अशा अटीवरच उमेदवारी देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.वह्या मुलांपर्यंत पोहोचतात का?आपल्या वाढदिवसानिमित्त गोळा करण्यात आलेल्या वह्या मुलांपर्यंत पोहोचतात का? असा सवाल करत प्राथमिक शाळा पार्किंग व जनावरांचे अड्डे बनल्याचे प्रियांका ससे हिने सांगितले.
‘आयटी’ कधी समजणार ?
By admin | Updated: September 1, 2015 00:19 IST