कोल्हापूर : ज्या मोगल बादशहाने छत्रपती संभाजी महाराजांना पकडून क्रूररित्या मारले, त्याचे नाव महाराष्ट्रातील एका मोठ्या शहराला असावे, हे दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.
सध्या महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून वादळ उठले आहे. कोणत्याही परिस्थितीत औरंगाबादचे नामांतर करण्यास काँग्रेसचा विरोध असेल, असे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी ही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सर्व शिवभक्तांच्या भावनांचा आणि अस्मितेचा विचार करून सरकारने लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणीही संभाजीराजे यांनी केली आहे. संभाजीराजे हे रविवारी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळीही पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी, औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करणे योग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे.