आजरा : कृषी उत्पादनातील दर्जाबाबत जागतिक स्तरावर स्पर्धा सुरू आहे. जगभरातील देश कृषी उत्पादनाच्या या स्पर्धेत स्वत:चे वेगळेपण सिद्ध करण्यास प्रयत्नशील आहेत. या स्पर्धेत भारतीय शेती टिकून राहायची असल्यास मोठ्या प्रमाणावर एकात्मिक गाव शेती करण्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी केले.आजरा महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक आणि आजरा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र विभागाच्या अधिवेशनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अशोक चराटी होते. डॉ. पाटील म्हणाले, उत्पादन खर्च कमी करणे व नवनवीन प्रयोग करण्यासाठी शेतीचा आकारही मोठा असणे आवश्यक आहे. यामुळे शेतकरी व शेती या दोन्हीचाही विकास होऊ शकतो. सरकारलाही आता आयात निर्यातविषयक बंधने लावताना विचार करावा लागणार आहे. नाबार्डच्या मदतीने गावपातळीवर धोरण ठरवून समूहशेती करण्याची गरज आहे. शेतीतून तरूण पिढी बाहेर पडत आहे. शहरीकरणाकडे भविष्यात हा वर्ग स्थलांतरित झाल्यास मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.अशोक कांबळे, विजयकुमार पाटील, प्रा. वैजनाथ बचुटे, रमेश कुरूणकर, आय. के. पाटील यांच्यासह अर्थशास्त्राचे अध्यापक उपस्थित होते. उपप्राचार्य बाळासाहेब रक्ताडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
एकात्मिक गाव शेती करण्याशिवाय पर्याय नाही,
By admin | Updated: December 16, 2014 00:05 IST