इचलकरंजी : आंदोलन व आंदोलक हे साम्राज्यवाद विरोधी लढ्यापासून संसदीय लोकशाही व्यवस्थेपर्यंत आदराचा विषय आहेत. मात्र, शेतकरी आंदोलनातील आंदोलकांची व त्यांच्या समर्थकांची सरसकट 'आंदोलनजीवी' अशी हेटाळणी करून समस्त आंदोलनकर्त्यांनाच अपमानित केले जात आहे. ही अतिशय निंदनीय बाब आहे, असे मत समाजवादी प्रबोधिनीत आयोजित 'आंदोलनजीवी देशउभारे देशभक्त असतात देशविके नव्हे' या विषयावरील चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. लोकशाही व्यवस्थेत आंदोलने, निदर्शने, मोर्चा असे मार्ग अवलंबणे गृहीत असते, पण सत्याला सामोरे जाण्याची, शंकांचे निरसन करण्याची कुवत वा धमक नसली की, अशी असंस्कृत भाषा येत असते. ती भ्याड मनोवृत्तीतून अथवा हुकूमशाही विकृतीतून येत असते. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने शेतकरी आंदोलनजीवी नसून पंतप्रधानच भांडवलदारजीवी असल्याची व ते आंदोलक आहेत जुमलेबाज नाहीत, अशी टीका करून शेतकऱ्यांची हेटाळणी केल्याबद्दल माफी मागावी अशी, तसेच २६ जानेवारीच्या प्रकाराची चौकशी करण्याचीही मागणी केली आहे. सरकारने एक-दोन बगलबच्च्या भांडवलदारांच्या ओसंडून वाहणाऱ्या तिजोऱ्या पुन्हा भरण्याऐवजी या देशातील अब्जावधी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविले पाहिजेत. दमनाला अहिंसेने उत्तर देऊन यशस्वी होणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासह सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, समतेसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांचा हा देश आहे, असे चर्चासत्रात मत पुढे आले. प्रसाद कुलकर्णी यांच्या बीजभाषणानंतर झालेल्या चर्चासत्रात शशांक बावचकर, दयानंद लिपारे, तुकाराम अपराध, राजन मुठाणे, महालिंग कोळेकर, पांडुरंग पिसे, मनोहर जोशी, बापूसाहेब भोसले सहभागी झाले होते.
आंदोलनकर्त्यांनाच अपमानित करणे ही निंदनीय बाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:26 IST