लोकमत न्यूज नेटवर्क
तुरंबे : महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच आग्रही आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना संपल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा असलेला प्रोत्साहनपर कर्जमाफीचा प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध आहेत, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी केले.
अर्जुनवाडा (ता. राधानगरी) येथे माजी उपसभापती अरुण मारुतीराव जाधव यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित युवक व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश आबिटकर होते.
यावेळी कोरोना योद्धा व माजी सैनिकांचा सत्कार, कोरोना लसीकरण, रक्तदान शिबिर आदी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. प्रास्ताविक दादासोा पाटील यांनी केले. शंभूराजे देसाई म्हणाले, कोरोना संकट थोपवण्यात राज्य सरकारची पहिली दोन वर्षे गेली, सर्व उत्पन्नाचे मार्ग बंद झाले असताना काटकसर करत सर्वाधिक निधी कोरोना संकट थोपविण्यासाठी खर्च केला. त्यामुळे कोरोना रोखण्यात राज्य सरकार यशस्वी झाले, केंद्राकडून राज्याला अद्याप साडेबत्तीस हजार कोटी येणं आहे तरीही प्रामाणिक शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यास महाविकास आघाडी सरकार वचनबद्ध आहे.
आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, अरुण जाधव हे जमिनीवरचे कार्यकर्ते आहेत. ज्येष्ठ नेते मारुतीराव जाधव यांच्या विचारांचा वारसा जपत लोकांची सेवा करण्याचे काम करण्याची जबाबदारी यशस्विपणे त्यांनी पेलली आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून व जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापतिपदाच्या माध्यमातून अरुण जाधव आणि वंदना जाधव यांच्यातील सामाजिक दृष्टिकोन अधोरेखित होतो.
अरुण जाधव म्हणाले १९९० ला तळाशीचा सरपंच झालो तेव्हापासून आतापर्यंत राजकारणात कधीही मागे वळून बघितले नाही. वडिलांच्या ‘शब्दा’पुढे कधी गेलो नाही. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांचे भाषण झाले. ज्येष्ठ नेते मारुतीराव जाधव यांनी माजी मंत्री बाळासाहेब देसाई यांच्या कार्याचा आढावा घेतला. बाबुराव देसाई, नंदकुमार ढेंगे, कल्याणराव निकम, दत्तात्रय उगले, अभिजित तायशेटे, अर्जुन आबिटकर, नंदकिशोर सूर्यवंशी, शामराव भावके, अशोकराव फराकटे, प्रकाश पाटील, विश्वनाथ पाटील, सुभाष पाटील, बाळासाहेब नवणे, धैर्यशील भोसले, अविनाश चिंदगे, विश्वनाथ तहसीलदार उपस्थित होते
मंत्री मुश्रीफ यांच्या पाठीशी......
हसन मुश्रीफ यांच्यावर वैयक्तिक दुश्मनी असल्यासारखी मर्यादेच्या पलीकडे जाऊन राजकीय चिखलफेक सध्या सुरू आहे. त्याला कुठेतरी पूर्णविराम मिळाला पाहिजे. शेवटी राजकारण म्हणजे व्यक्तिगत शत्रुत्वाचे व्यासपीठ नाही म्हणून आम्ही सर्वजण महाविकास आघाडी सरकारचा आमदार या नात्याने आम्ही मंत्री मुश्रीफ यांच्या सोबत आहोत, असे प्रकाश आबिटकर म्हणाले.
२१ आबिटकर
फोटो ओळी
अर्जुनवाडा येथे अरुण जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सपत्नीक सत्कार करताना गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई आमदार प्रकाश आबिटकर, वंदना जाधव, विजय देवणे, अभिजित तायशेटे, मारुतीराव जाधव.