लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्यातील नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देणार, या घोषणेपासून आघाडी सरकार बाजूला जाणार नाही. राज्याच्या प्रमुखांनी विधिमंडळात जाहीर केल्याने सभागृहाच्या रेकॉर्डवर आले आहे. राज्याची आर्थिक घडी मूळ पदावर आल्यानंतर प्रोत्साहनपर अनुदान देणारच, असा पुनर्उच्चार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना काय बोलतो हेच कळत नाही. त्यांना विनाशकाली विपरीत बुद्धी सुचत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
उपमुख्यमंत्री पवार हे सोमवारी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कोल्हापुरात आले हाेते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, लॉकडाऊनचा फटका बसलेल्या रिक्षाचालक, बांधकाम मजूर, घरेलू कामगार आदींना मदत दिली आहे. निर्बंधाचा त्रास होतो याची जाणीव आम्हालाही आहे, मात्र त्याशिवाय पर्याय नसून व्यापारी वर्गानेही आणखी थोडे सहकार्य करावे.
केंद्राने मदत करूनही आघाडी सरकार टीका करते, या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर विचारले असता, जीएसटीपोटी केंद्राकडून २४ हजार कोटी यायचे आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहीने केंद्राला पत्र पाठवले आहे. चंद्रकांत पाटील दुर्दैवाने मंत्रिमंडळात नसल्याने त्यांना आकडे माहीत नाहीत. आम्ही सरकारमध्ये आहे, आम्हाला सहीचा अधिकार असल्याने सर्व गोष्टी आम्ही बघतो. काही लोकांना आपण काय बोलतो, हेच कळत नाही.
शाहू छत्रपती यांच्याकडे चहाच्या निमित्ताने गेल्याने तिथे वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाल्या. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले, सगळ्या घटकांचे प्रश्न सुटले पाहिजे, हा आमचा प्रयत्न असतो. इतर आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण मिळण्यासाठी मार्ग काढला पाहिजे. मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन बारा मागण्या केल्या. त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आरक्षणाचा विषय होता. केंद्राने आरक्षणाबाबत संसदेत बिल आणून मंजूर करावे व कायदा केल्यानंतर हा प्रश्न संपेल. याबाबत अहमदाबाद न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने अहवाल दिला असून, त्यानुसार पुढील पाऊले उचलली जातील. जिथे जिथे निवडणुका झाल्या तिथे रुग्ण वाढल्याने आषाढी वारीला परवानगी दिलेली नाही. याबाबत वारकऱ्यांशी चर्चा झाली असून कोरोना नसता तर वारीमध्ये आम्ही पुढे असतो, असेही पवार यांनी सांगितले.
मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहण्याचा प्रत्येकाला अधिकार
नाना पटोले यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षेबाबत विचारले असता, मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आपला पक्ष वाढीसाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो, त्यात गैर काय? असेही अजित पवार यांनी सांगितले.
कोल्हापूरसाठी १० टक्के जादा लस
लोकसंख्येच्या तुलनेत लस दिली जाते. मात्र, जिथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अधिक आहे, तिथे ५ ते १० टक्के जादा लस देण्याबाबत कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
ग्रामीण भागात सोमवारी दिव्यांगांना लसीकरण
कोल्हापूर शहरात दिव्यांगांचे लसीकरण प्राधान्याने केले जात आहे. ग्रामीण भागातही प्रत्येक सोमवारी त्यांच्या गावात जाऊन लसीकरण देण्याच्या सूचना दिल्याचे पवार यांनी सांगितले.
आशा वर्कर्स, सफाई कामगारांचा प्रश्न मार्गी लावू
आशा वर्कर्स युनियनच्या प्रमुखांशी आरोग्यमंत्र्यांनी सकारात्मक चर्चा केलेली आहे. सफाई कामगारांबाबत येत्या अधिवेशनात पुरवणी मागणीत मंजुरी घेऊन त्यांचाही प्रश्न मार्गी लावू, असे पवार यांनी सांगितले.
...तर निर्बंध अधिक कडक
कोल्हापुरात सकाळी प्रवेश केल्यानंतर अनेकांच्या तोंडाला मास्क दिसले नाहीत, कोण पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने खिशातील रुमाल बांधून वेळ मारून नेतो, ही बाब गंभीर आहे. जर नियमाची काटेकोर अंमलबजावणी केली नाहीतर निर्बंध अधिक कडक करावे लागतील, असा इशारा पवार यांनी दिला.
‘एमपीडब्ल्यू’चा निकाल दोन दिवसांत
‘एमपीडब्ल्यू’बाबत औरंगाबाद, जळगाव, जालना येथे पोलीस गुन्हा दाखल झाला आहे. त्याची चौकशी सुरू असल्याने हे जिल्हे सोडून उर्वरित जिल्ह्याचा निकाल दोन दिवसांत जाहीर केला जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.