इचलकरंजी : माध्यमात होणारे बदल अपरिहार्य आहेत. माध्यमांचे स्वरूप बदलतच राहणार. मात्र, समाजाला पुढे नेणारी मानवी व घटनात्मक सामाजिक मूल्ये बदलत नसतात. ती मूल्ये वर्तमानपत्रात प्रस्थापित करून भविष्याकडे सोपविण्याचे आणि पुढची पिढी सामाजिकदृष्ट्या जागृत बनविण्याचे काम वृत्तपत्र पत्रलेखक करीत असतात. त्यामुळे वृत्तपत्रसृष्टीत अगदी पहिल्यापासून महत्त्वाचा घटक म्हणून वृत्तपत्र पत्रलेखकाचे महत्त्व मोठे आहे, असे मत शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्र प्रा.डॉ. निशा मुंडे-पवार यांनी व्यक्त केले.
येथील वृत्तपत्र पत्रलेखक संघाच्या वर्धापनदिनी आयोजित व्याख्यानात ‘वृत्तपत्र पत्रलेखक व माध्यमातील बदल’ या विषयावर प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अलका स्वामी होत्या.
सुरुवातीस क्रांतिविरांगणा हौसाताई पाटील व वृत्तपत्र पत्रलेखक संघाच्या उपाध्यक्षा सुनंदा चौगुले यांना आदरांजली वाहण्यात आली. अभिजित पटवा यांनी स्वागत, तर पांडुरंग पिसे यांनी प्रास्ताविक केले. प्रसाद कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कोरोनाचे नियम पाळून विविध क्षेत्रांतील नागरिक उपस्थित होते. मनोहर जोशी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंडित कोंडेकर, महेंद्र जाधव, दीपक पंडित, रमेश सुतार, नारायण गुरबे, महादेव मिणची, आदींनी परिश्रम घेतले.