कोल्हापूर : शिवसेना-भाजप युतीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह राष्ट्रीय समाज पक्ष व रिपब्लिकन पक्ष आठवले गटाची विधानसभा निवडणुकीत गरज आहे की आमचे लोढणे झाले आहे, हे तरी एकदा त्यांनी स्पष्टपणे सांगावे, अशी विचारणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी काल, सोमवारी मुंबईत झालेल्या महायुतीच्या जागावाटपाच्या बैठकीत केली. आम्ही लोढणे झालो असू, तर आमचा आम्हाला मार्ग मोकळा आहे. नंतर जागावाटपात पुढे जाऊन ऐनवेळी जमत नाही असे सांगू नका, असेही शेट्टी यांनी मुख्यत: शिवसेना व भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांना ठणकावले.मुंबईत झालेल्या या बैठकीस ‘स्वाभिमानी’तर्फे शेट्टी यांच्यासह सदाभाऊ खोत, प्रा. जालंदर पाटील उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत महायुती घडविण्यात भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा पुढाकार होता. त्यांच्याशी शेट्टी यांचे चांगले संबंध होते. शेट्टी यांची ताकद त्यांना माहीत होती; परंतु लोकसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळाल्यानंतर शिवसेना-भाजप युतीकडून इतर घटकपक्षांबद्दल कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. या घटकपक्षांना सगळ्या मिळून १५च जागा दिल्या जातील, अशा बातम्याही युतीच्या नेत्यांकडून पेरल्या जात आहेत. त्याबद्दलही शेट्टी यांनी सुरुवातीलाच विचारणा केली. तुमची १५ जागा देण्याची भूमिका असेल, तर आजच्या बैठकीत पुढे चर्चा करायलाच नको, असे त्यांनी म्हटल्यावर युतीच्या नेत्यांनी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेला १५ हा आकडा खोटा असून, अजून किती जागा द्यायच्या, हा निर्णय कोणत्याच पातळीवर झाला नसल्याचे स्पष्ट केले. पहिलीच बैठक असल्याने त्यामध्ये जागावाटपाबाबत फारशी चर्चा झाली नसल्याचे सांगण्यात आले.लोकसभा निवडणुकीत जे लोक महायुतीच्या थेट विरोधात काम करीत होते, त्यांना आता शिवसेना-भाजपने उमेदवारी देऊ नये, असा आग्रह बैठकीत शेट्टी यांनी धरला. आमची ताकद किती व काय आहे, याची आम्हाला चांगली कल्पना आहे. त्यामुळे कुठपर्यंत थांबायचे हेदेखील आमचे ठरलेले आहे; परंतु महायुतीतील महत्त्वाच्या दोन पक्षांची भूमिका जर आम्हाला सन्मान देण्याची नसेल, तर विधानसभेला महायुती आकारास येण्यात अडचणी येतील, असे शेट्टी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
लुटारूंना महायुतीत घेऊ नयेगेल्या पंधरा वर्षांत दोन्ही काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सत्तेचा गैरवापर करून सरकारला लुटले. त्यांची जनमानसातील प्रतिमा अत्यंत वाईट आहे. असेच काही नेते आता महायुतीचे सरकार येणार म्हटल्यावर उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. अशा लोकांना सामान्य जनतेचा तीव्र विरोध आहे. झेंडा बदलून येणाऱ्या अशा भ्रष्ट नेत्यांना प्रमुख दोन्ही पक्षांनी महायुतीत घेऊ नये, अशी भूमिकाही शेट्टी यांनी बैठकीत मांडली.