कोल्हापूर : त्रिसदस्यीय वाॅर्ड रचना योग्य की अयोग्य, त्याचा फायदा शहरवासीयांना कितपत होणार हे आता येणारा काळ ठरविणार आहे. मात्र, अशा पद्धतीने होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत राजकीय पक्षांना विशेषत: काॅंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षांना आघाडी करणे काहीशी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. आघाडी झाल्यास पक्षातील सर्वच इच्छुकांचे समाधान करणे अशक्य होणार असल्याने बंडखोरीचा धोका मोठा आहे.
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काॅंग्रेस अशा तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्रित निवडणुकीला सामोरे जातील की स्वतंत्र लढतील हाच औत्सुक्याचा विषय ठरणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप - ताराराणी आघाडीने यापूर्वी आघाडी केली होती. परंतु काॅंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांनी स्वतंत्रपणे लढण्याचा प्रयत्न केला. २०१५ च्या निवडणुकीनंतर या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महापालिकेत सत्ता स्थापन केली होती. पाच वर्षे महापालिकेत एकत्र राहिले. परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपासून शिवसेना पदाधिकारी काॅंग्रेस नेत्यांवर नाराज आहेत.
तिन्ही प्रमुख पक्ष सध्या राज्यातील सत्तेत एकत्र असल्याने साहजिकच त्यांच्याकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या जास्त असणार आहे. विशेषत: काॅंग्रेस व राष्ट्रवादीकडे तर सर्वाधिक इच्छुक असतील. गत निवडणुकीत हे पहायला मिळाले होतेच. त्रिसदस्यीय वाॅर्ड झाल्यामुळे राज्यात सत्तेत असणाऱ्या कोणत्याच राजकीय पक्षाला आघाडी करून निवडणूक लढविणे अशक्य होणार आहे. काॅंग्रेस, राष्ट्रवादी पक्षांकडे एकेका प्रभागातून दोघा तिघांनी उमेदवारी मागितली होती. त्यामुळेच बंडखोरी, नाराजीचा त्रास सहन करावा लागणारच होता.
आता त्रिसदस्यीय वाॅर्ड रचना होणार आहे. अशावेळी आघाडी केल्यास प्रत्येक पक्षाच्या वाटणीला येणाऱ्या जागांची संख्या कमी होणार आहे. तीन प्रभागांचा मिळून एक वॉर्ड तयार होणार असल्याने वॉर्डातील जागांसाठी सात ते आठ उमेदवार पक्षांकडे उमेदवारी मागतील. त्यामुळे कोणाला उमेदवारी द्यायची आणि कोणाला थांबवायचे हा नेत्यांपुढील प्रश्न डोकेदुखीचा ठरणार आहे.
राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काॅंग्रेस, राष्ट्रवादी तसेच शिवसेना पक्षाकडे तिकीट मागणाऱ्यांची संख्या आणि वाट्याला येणाऱ्या जागा यांचा ताळमेळ बसणार नाही. त्यामुळेच हे घटक पक्ष आघाडी करतील अशी अपेक्षा करणे चुकीचे होईल. तिन्ही पक्षांचा कल हा आपापल्या ताकदीवर स्वतंत्र लढून निवडून यायचे आणि सत्ता स्थापनेवेळी एकत्र यायचे हा फॉर्म्युला वापरतील असे दिसते.
छोट्या पक्षांची झाली मोठी गोची -
आम आदमी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, स्वाभिमानी पक्ष, जनता दल यासारख्या प्रभावहीन ठरलेल्या छोट्या पक्षांची मोठी गोची झाली आहे. स्वतंत्र लढावे म्हटले तर अठरा हजार मतदारांसमोर प्रभाव टाकेल असे उमेदवार नाहीत आणि कोणा मोठ्या राजकीय पक्षासोबत जावे म्हटले तर उमेदवारी मिळवताना नाकीनऊ येणार आहे. त्यामुळे त्यांनाही अस्तित्वासाठी, पक्षाच्या नावासाठी काही उमेदवार उभे करावे लागतील. पण त्यांना निवडून येण्याची शक्यता फारच कमी असेल.
- भाजप - ताराराणी लढणार एकत्र -
भारतीय जनता पक्ष आणि ताराराणी आघाडी एकत्र येऊन निवडणूक लढण्याची जास्त शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाकडे पुरेसे उमेदवार नसले तरी ताराराणी आघाडीचे कार्यकर्ते शहरभर आहेत. गतवेळच्या निवडणुकीत त्यांच्यातील ताळमेळ चुकला आणि सत्ता मिळविण्याचे त्यांचे स्वप्न भंगले होते. आता त्यांना तडजोडी करून उमेदवारांना संधी देणे शक्य होणार आहे. ऐनवेळी काॅंग्रेस, राष्ट्रवादीतील नाराजांचे पाठबळ त्यांना मिळू शकते.
‘आमचं ठरलंय’चा उपयोग होऊ शकतो.
एखाद्या वॉर्डात काॅंग्रेस किंवा राष्ट्रवादीचा उमेदवार जिंकण्यासाठी आवश्यक असणारी मते घेऊ शकत नाही हे लक्षात यायला लागताच ‘आमचं ठरलं’ च्या तत्त्वाप्रमाणे निवडून येणाऱ्या सहकारी पक्षाच्या उमेदवारास ऐनवेळी पाठबळ दिले जाईल.