प्रवीण जगताप - लिंगनूर -मिरज पूर्व भागातील तापमानाचा पारा ११ अंशावर आला आहे. मागील चार दिवसांपासून १२ ते ११ अंशापर्यंत तापमान खाली आले असून हुडहुडी वाढतच आहे. बोचऱ्या थंडीमुळे शेतीकामांत त्रास सोसावा लागत आहे. आणखी तीन-चार दिवसांपर्यंत ही बोचरी थंडी अशीच टिकून राहणार असून त्यानंतर १६ जानेवारीपासून थंडीमध्ये अल्पशी घट होण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात ढगाळ हवामान नसल्याने थंडीचा पारा ११ अंशावर आला असून आता हुडहुडी भरू लागली आहे. दि. १४ ते १७ पर्यंत पारा ११ वरच स्थिर राहणार असून त्यापुढे २१ जानेवारीपर्यंत १३ ते १४ अंशाच्या सरासरीने तापमान राहण्याचा अंदाज आहे. दि. २२ व दि. २५ जानेवारी रोजी मात्र ढगाळ हवामानाचा अंदाज दर्शविण्यात आला आहे. त्यानंतर ३० तारखेपर्यंत तापमानाची सरासरी पुन्हा १४ अंश राहण्याची शक्यता आहे. ९ फेब्रुवारीपासून थंडीचा पारा उतरण्यास सुरूवात होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.त्यामुळे काढणी सुरू असलेल्या द्राक्षबागांपेक्षा येत्या पंधरवड्यात व महिन्याभरात काढणीस येणाऱ्या द्राक्षबागांच्या उत्पादकांचे हवामान अंदाजाकडे लक्ष आहे. दि. २२ व २५ जानेवारी रोजी ढगाळ वातावरणाचा अंदाज असल्याने द्राक्ष उत्पादकांत चिंता आहे. मुळातच डिसेंबर महिना व नववर्षाच्या सुरुवातीच्या दिवशी पावसामुळे द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे पुन्हा ढगाळ वातावरणाच्या अंदाजामुळे उत्पादक धास्तावले आहेत.हवामान अंदाजावर लक्षमिरज पूर्व भागात द्राक्षपट्टा वाढला आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांचे हवामान अंदाज दर्शविणाऱ्या सर्व संकेतस्थळांवर बारकाईने लक्ष असते. भागातील द्राक्षबागांची काढणी वेगात आहे. सप्टेंबर व आॅक्टोबर छाटणीच्या द्राक्षबागांतील द्राक्षमणी वाढीस लागले असून, उशिरा छाटणीच्या बागांतील द्राक्षघडांत पाणी व साखर उतरू लागली आहे.
हुडहुडी अजून तीन दिवस!
By admin | Updated: January 14, 2015 00:30 IST