ऐनी, ता. राधानगरी येथील आठ शेतकऱ्यांच्या काही घरांना व गोठ्यास आग लागून दहा लाखांचे आर्थिक नुकसान झाले. ग्रामस्थांच्या प्रसंगसावधानाने यामध्ये दोन म्हशींना आगीची झळ बसून किरकोळ जखमी झाल्या आहेत. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. गोठ्यातील सर्वच जनावारांचे दोर कापून जवळपास १५ म्हशींचा जीव वाचला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : शनिवारी पहाटे तीन वाजता अचानक प्रथम एका घरवजा गोठ्याला आग लागली. या घरामध्ये गवत पिंजर, लाकडे,शेणी भरलेल्या असल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले आणि बघताबघता आग इतर सात शेतकऱ्यांचा घराकडे ती पसरली. आगीचे लोट असताना देखील ग्रामस्थांनी धैर्य दाखवत जनावरांचे दोर कापले. आसपासचे सर्वच ग्रामस्थ जागे झाले आणि पुढे होणारा अनर्थ टळला.
यामध्ये शंकर भिवा बावकर, संदीप जोती पाटील, मारुती जोती पाटील, भिकाजी सखाराम पाटील, रंगराव सखाराम पाटील, बाबुराव सखाराम पाटील, सुखदेव हरी पाटील व संगीता पांडुरंग पाटील या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आग ग्रामस्थांनी व बिद्री साखर कारखान्याचा दोन बंबांनी चार तासांच्या अथक परिश्रमाने आटोक्यात आणली. नेमके आगीचे कारण समजले नसून या आगीत प्रापंचिक साहित्य व शेतीसाहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनास्थळी आमदार प्रकाश आबिटकर,ए. वाय. पाटील, विजयसिंह मोरे,सरपंच शोभा आडसूळ,बळवंत पाटील, मारुती तोडकर यांनी भेटी दिल्या तर मंडल अधिकारी शिवाजी कोळी,तलाठी प्रकाश गुरव,ग्रामसेवक दीपक पाटील,पोलीस पाटील विश्वास पाटील,कोतवाल दत्तात्रय देऊलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
२९ एेनी आग
फोटो ओळ-
ऐनी ता.राधानगरी येथे घरवजा गोठ्यास लागलेल्या आगीत नुकसान झालेले घर