कुरुंदवाड : केंद्र सरकारने शेतकरीविरोधी कायदे मंजूर करून शेतकरी आणि शेतमजुरांचा गळा घोटला आहे. या अध्यादेशामुळे शेतकरी रसातळाला जाऊन कर्जबाजारी होऊन शेतकऱ्यांच्या जमिनी भांडवलदारांच्या घशात जाणार आहेत. तरी सरकारने शेतकऱ्यांना जाचक ठरणारे हे विधेयक तत्काळ रद्द करावे, यासाठी तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी देत, येथील पालिका चौकात केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कायद्यांची होळी करून निषेध नोंदवला. माजी नगराध्यक्ष पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करीत शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला.
दरम्यान, अध्यादेश रद्द न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी सुरेश बिंदगे, शाहू पतसंस्थेचे अध्यक्ष किरण आलासे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अभय पाटुकले, राजेसाहेब झाडवाले, आदींनी अध्यादेशाविरोधी भाषणे केली. आंदोलनात शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष तानाजी आलासे, जिनगोंड पाटील, अण्णासाहेब गुदले, रघू नाईक, मुकुंद सावगावे, प्रवीण खबाले, रावसो पाटील, सोहेब अथणीकर, आदी सहभागी झाले होते.
फोटो - ०४१२२०२०-जेएवाय-०३
फोटो ओळ - कुरुंदवाड येथे शेतकरी व नागरिकांनी शेतकरीविरोधी अध्यादेशाची होळी केली.