चांदी उद्योगामध्ये हुपरी व परिसरामध्ये काम करणाऱ्या कारागीर व कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या उद्योगांवर सुमारे ५ हजार कारागीर व २५ हजार कामगार अवलंबून आहेत. एप्रिलपासून राज्य शासनाने मिनी लॉकडाऊन जाहीर केल्याने चांदी हस्तकला उद्योग पूर्णपणे बंद अवस्थेत आहे. सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आल्याने व्यवसायासाठी आवश्यक असणारी चांदी बाहेरील बाजारपेठेतून येत नाही व तयार केलेले दागिनेही बाजारपेठेत जात नाहीत. परिणामी चांदी उद्योग पूर्णपणे ठप्प झाला आहे. गेल्यावर्षी मार्चमध्ये केंद्र शासनाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यावेळी सोने, चांदी व हिरे व्यवसायातील सर्व घटकांसाठी कार्यरत असलेल्या दिल्लीतील GJEPC या संस्थेने या उद्योगातील देशभरातील कारागीर व कामगारांना प्रत्येकी १५०० रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्याकडे कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या काही मोजक्याच कामगारांना ही मदत मिळाली होती. या संस्थेकडे अनेक कामगारांनी ऑनलाइन अर्ज करून मागणी केली असल्याने त्यांच्याकडे अनेक कामगारांची व कारागीरांची नोंदणी झालेली आहे. त्यामुळे राज्य शासनाने या संस्थेबरोबरच कामगार विभाग व मदत पुनर्वसन विभाग यांच्याकडून माहिती घेऊन चांदी उद्योगातील सर्व प्रकारच्या असंघटित कारागीर व कामगारांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी राजू शिंदे यांनी शासनाकडे केली आहे.
चांदी उद्याेगातील कामगारांना मदत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:24 IST