लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी दिवसभर ढगाळ वातावरणासह भुरभुर राहिली. उघडझाप, थंड हवा असली तरी पावसाला जोर लागत नाही. धरणक्षेत्रातही पाऊस कमी असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत फारसा फरक झालेला नाही. गगनबावडा तालुक्यात मात्र पाऊस चांगला आहे.
दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले आहे. काही ठिकाणी हलक्या सरी कोसळत असल्या तरी ‘तरण्या नक्षत्रासारखा पाऊस लागत नाही. या नक्षत्र काळात धुवाधार पाऊस असतो. मात्र, यंदा उघडझाप राहिल्याने सगळ्यांचीच चिंता वाढली आहे. रविवारी सकाळपासून काही ठिकाणी अधूनमधून तुरळक सरी कोसळल्या. दुपारनंतर ढगांची दाटी राहिली; मात्र त्याचे जोरदार सरीत रूपांतर झाले नाही. धरणक्षेत्रातही तुरळकच पाऊस आहे. पंचगंगेची पातळी ११.७ फुटांवर असून, इचलकरंजीचा बंधारा पाण्याखाली आहे.