कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणाबाबत ‘निरी’ने मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या दोषपूर्ण अहवालावर कोल्हापूर महापालिका व इचलकरंजी नगरपरिषदेला म्हणणे मांडण्याचे आदेश आज, शुक्रवारी न्यायालयाने दिले. सुनावणी पुढील शुक्रवारपर्यंत तहकूब ठेवण्यात आली आहे. ‘निरी’च्या प्रतिनिधींनी आज शिफारशीच्या अनुषंगाने कोल्हापूर महापालिका व इचलकरंजी नगरपरिषदेने केलेल्या उपाययोजनेसंदर्भात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर आपले लेखी म्हणणे दाखल केले. इचलकरंजी येथील दत्ता माने, सदा मलाबादे यांनी वकील धैर्यशील सुतार यांच्यामार्फत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाच्या न्या. अभय ओक व न्या. ए. एस. चांदूरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. कोल्हापूर महापालिकेने केलेल्या दाव्याप्रमाणे ६५ टक्के शहराला सांडपाणी व्यवस्थापन असल्याचे सांगितले.(पान १ वरून) पण याची शहानिशा करणे गरजेचे असल्याचे ‘निरी’ समितीने सांगितले. रंकाळा तलावातील सांडपाणी महापालिकेने दुधाळी नाल्याकडे वळवले आहे, हे अयोग्य असल्याचे ‘निरी’ने म्हटले आहे. दुधाळी व जयंती नाल्यातील पंपिंग स्टेशनची क्षमता पाहता यावर अतिरिक्त ताण पडणार आहे. दुधाळी नाल्यावरील १७ दशलक्ष लिटरचा सांडपाणी प्रक्रिया केंद्र आॅगस्टपर्यंत पूर्ण केला पाहिजे. तो पूर्ण होत नाही तोपर्यंत जैविक तंत्राचा वापर करून प्रदूषणावर नियंत्रण ठेवावे. शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी आय.आय.टी.ने विकसीत केलेले सेप्टिक टँकचा वापर करावा, असे ‘निरी’ने म्हटले आहे. यावर, खंडपीठाने महापालिका व इचलकरंजी नगरपरिषदेच्या वकिलांना आपले म्हणणे पुढील शुक्रवारी मांडण्याचे आदेश दिले. त्यानंतर याचिका दाखल करून घेऊन सर्व समावेशक असे आदेश दिले जातील, असे स्पष्ट केले.
पंचगंगा प्रदूषणप्रश्नी म्हणणे मांडा
By admin | Updated: July 19, 2014 00:32 IST