बांबवडे : चालू हंगामात भाताला १३६० ते १४०० रुपयांचा हमीभाव व ४०० रुपये बोनस मिळावा, तसेच शेतकरी मागतील त्या ठिकाणी शासकीय भात खरेदी केंद्र उभारण्याची मागणी खासदार राजू शेट्टी यांनी बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे दुसऱ्या भात परिषदेमध्ये ठरावाद्वारे केली.प्रारंभी सुरेश म्हासरकर यांनी स्वागत केले. विक्रम पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी खासदार शेट्टी म्हणाले, पहिल्या भात परिषदेचा परिणाम म्हणजे केवळ सरकारच्या धोरणानुसार गेल्या वर्षी १३१० रु. हमीभाव व २०० रु. बोनस असा १५१० रु. प्रति क्विंटल दर शेतकऱ्यांना मिळाला. दुसऱ्या भात परिषदेमध्ये १३६० ते १४०० रु. हमीभाव व ४०० रु. बोनस तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या, असे ठराव उद्याच्या अधिवेशनात ठेवून आमच्या ठरावाचे काय करताय, हे विचारणार असल्याचे खासदार शेट्टी यांनी सांगितले.भातपिकाचा उत्पादन खर्च वाढल्याने शेतकऱ्यांच्या मुलांना शेती सोडून चाकरमाने म्हणून मुंबईला जावे लागते. त्यांच्या हाताला काम मिळायचे असेल तर विविध पिकांवर प्रक्रिया करणारे छोटे-मोठे उद्योग येथेच उभा राहणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करू, असेही शेट्टी म्हणाले. विधानसभेतील अपयशाबद्दल बोलताना शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणारे, त्यांच्यासाठी संघर्ष करणारे पराभूत होतात; मात्र शेतकऱ्यांसाठी चकार शब्दही न काढणारे विजयी होतात. ही मानसिकता लोकांनी आता बदलावी म्हणजे सत्तेसाठी दुकानदारी मांडणाऱ्या राजकारण्यांना चाप बसेल.प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आपल्या खास शैलीत शेतकऱ्यांबद्दल चकार शब्द न बोलणाऱ्या नेत्यांवर टीका करताना, सर्व रोगांवर एखादा रामबाण उपाय असतो, तसे कापूस, भात, कांदा, ऊस असो की शाहूवाडीतील बॉक्साईट असो, सर्वांना योग्य न्याय मिळायचा असेल तर राजू शेट्टी यांनी आंदोलन करून जेलमध्ये जावे. म्हणजे सर्व पिकांना आपोआप रास्त भाव मिळतो. मग असे असेल तर संघटनेचे प्रतिनिधी विधानसभेत पाठवायची वेळ आल्यावर तुम्ही माघारी का असता, असा जाब विचारून, जर हे विधानसभेत गेले तर आमच्यासाठी कोण भांडणार, असा प्रश्न तुम्हाला पडत असला, तर निवडून दिले तरी आणि नाही दिले तरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी नेहमीच रस्त्यावर उतरतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.यावेळी अमरसिंह पाटील, प्रा. जालंदर पाटील, राजेंद्र गड्यान्नावार, जिल्हा परिषदेचे सदस्य सावकर मादनाईक, वसंत पाटील, भगवान काटे, बाळासो कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती सीमा पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्या शीला पाटील, सागर शंभूशेटे, तुकाराम खुटाळे, गोरक्ष पाटील, अनिल पाटील, बबन माने, जयसिंग पाटील, भीमराव पाटील, अमोल महाजन, आदी उपस्थित होते. कारखानदार अस्वस्थदरवर्षी संघटना आंदोलन करते, त्याचा फायदा कारखान्यांना होतो. सरकार अनुदान जाहीर करते. आता संघटना गप्प आहे आणि सरकार आपल्याला अनुदान देणार नाही म्हणून कारखानदार अस्वस्थ झाले आहेत, परंतु आमची मागणी मान्य न झाल्यास येत्या २५ तारखेला पुणे साखर आयुक्तालयावर मोर्चा निघणार असल्याचा पुनरुच्चार खासदार शेट्टी यांनी यावेळी केला.सरकारच्या माध्यमातून दबावदरवर्षी सरकारच्या माध्यमातून संघटनेवर दबाव टाकला जायचा. आता सरकार आमचे आहे. आम्ही कारखानदारांवर दबाव टाकून त्यांना गुडघे टेकायला लावू, असे खासदार शेट्टी यांनी सांगितले.श्सळीतून भाकरी व नळीतून भाजीआमचे चार-सहा आमदार जरी निवडून आले असते, तरी पवार काका-पुतण्यांना सळीतून भाकरी व नळीतून भाजी आम्ही निश्चितच दिली असती, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.
भाताला १४०० हमीभाव द्या : शेट्टी
By admin | Updated: November 10, 2014 00:47 IST