कोल्हापूर : विविध २८ राज्ये, आठ केंद्रशासित प्रदेश आणि १८ जागतिक वारसास्थळांचा प्रवास करत कोल्हापूरच्या गायत्री लक्ष्मण पटेल यांनी महिला सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण केली. देशभर १८० दिवस तब्बल ३० हजार किलोमीटरचा प्रवास करून ती गुरुवारी कोल्हापुरात परतली. घाटगे ग्रुप, टीव्हीएस, माय टीव्हीएसने तिचे उत्साहात स्वागत केले. टीव्हीएसने तिला देशातील पहिली टीव्ही अपाची आरआर ३१० (बीओटी) प्रदान करून सन्मानित केले.
इंटेरिअर डिझायनर असलेली गायत्री ही रेसकोर्स (संभाजीनगर) येथे राहते. तिने ‘वन ड्रीम, वन राइड-इंडियन ओडिसी’ हे ब्रीद घेऊन कोल्हापुरातून दि.५ डिसेंबर रोजी मोटारसायकल प्रवास सुरू केला. टीव्हीएस अपाची आरटीआर (२०० फोरव्ही) या दुचाकीवरून ती रोज ४०० ते ७०० किलोमीटरचा प्रवास करत होती. मुंबई, जयपूर, दिल्ली, श्रीनगर, आग्रा, सिलीगुडी, कोलकाता, भोपाळ, भुवनेश्वर, कोइम्बतूर, हैदराबाद, चेन्नई, कोची, बंगळुरू याठिकाणी प्रवास करून ती गुरुवारी कोल्हापुरात परतली. माई टीव्हीएस येथे माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी नगरसेविका जयश्री जाधव यांच्या हस्ते ‘अपाची आरआर’ ही मोटारसायकल गायत्री हिला प्रदान करण्यात आली. यावेळी घाटगे ग्रुपचे अध्यक्ष मोहन घाटगे, ‘टीव्हीएस’चे महाराष्ट्राचे एरिया मॅनेजर अंबरीश अवस्थी, प्रीमिअम मोटरसायकल विभागाचे सहायक व्यवस्थापक शॉन कॉलिन्स, माई टीव्हीएसचे महाव्यवस्थापक अनिल कांबळे, उद्योजक सत्यजित जाधव, गायत्रीचे वडील लक्ष्मण, आई पुष्पा, भाऊ दीप पटेल, जयेश ओसवाल आदींची उपस्थिती होती. गायत्री कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
महिलांना प्लॅटफॉर्म दिल्याचा आनंद
कोल्हापुरातील युवती, महिलांना रायडर म्हणून प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रायडिंगची सन २०१६ मध्ये सुरुवात केली. त्यात यशस्वी झाल्याचा आनंद होत असल्याचे गायत्री हिने सांगितले. तीस हजार किलोमीटरचा प्रवास रस्ते, तेथील वातावरण कसे असणार याची माहिती नव्हती. मात्र, जिद्दीने आणि एक मिशन समजून हा प्रवास पूर्ण केला. त्यासाठी कुटुंबीय, टीव्हीएसचे पाठबळ लाभल्याचे तिने सांगितले.