महागाव : महागाव (ता. गडहिंग्लज) येथील फळविक्री व्यवसाय कोरोनामुळे ठप्प झाला असून, महिन्याला १० ते १५ लाखांचा उलाढाल ठप्प आहे. कोरोनामुळे बाहेरून येणारा मालही न आल्याने व्यवसायावर मंदीचे सावट आहे. केळी, आंबा या दोनच फळांची आता विक्रेते विक्री करताना दिसत आहेत.
गडहिंग्लज तालुक्यासह महागावमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, रुग्णांना प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सफरचंद, मोसंबी, संत्री, अननस, किवी, ड्रॅगनफ्रुट, पेरू या फळांतून मोठ्याप्रमाणात जीवनसत्त्वे मिळतात. रुग्णांना फळांचा मोठा आधार असतो. काही वेळा रुग्ण आहार घेत नाही. अशावेळी फळांचे रस त्यांना पोट भरण्यासाठी व थकवा दूर करण्यासाठी या फळांचा उपयोग होत असतो. आज रुग्णांचे नातेवाईक फळविक्रेत्यांकडे फळांची सातत्याने मागणी करत आहेत. मात्र, बेळगाव, निपाणी, कोल्हापूर या ठिकाणांहून फळे आणणेही शक्य नसल्याने ग्राहकांची मागणी पूर्ण करणे जिकिरीचे बनले आहे. एप्रिलपासून हा व्यवसाय ठप्प आहे.
त्यामुळे प्रशासन व ग्रामपंचायतीने अनेकवेळा लॉकडाऊन केला आहे. बाहेरून येणारे विविध फळे लॉकडाऊनमध्ये आलेली नाहीत. त्यामुळे स्थानिक उपलब्ध होणारे केळी व आंबा ही फळे विकून मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशातून सध्या फळविक्रेत्यांचे उदरनिर्वाह सुरू आहे. त्यामुळे गावातील सुमारे १५ ते २० फळविक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.