कोल्हापूर : काही खाद्यपदार्थ विक्रेते वडे, भजी, पुऱ्या, सामोसे, कचोरी, वा अन्य पदार्थ वारंवार तळलेल्या तेलाचा वापर करून करतात. हेच पदार्थ आपण आवडीने खातो. अशा वारंवार तळलेल्या तेलातील पदार्थ खाल्ल्यामुळे घसा दुखणे, पोटाचे विकार, मूत्रपिंडाचे विकार, कर्करोगासारखे रोगही बळावू शकतात. असा निष्कर्ष एका सर्वेक्षणात समोर आला आहे. त्यापेक्षा असे तेल अन्य कामात उपयोगात आणावे, असा तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे.
एकच प्रकारचे तेल वारंवार वापरले तर त्यात पाॅलिमरायझेशन प्रक्रिया होऊन तेलातील पोलर कम्पाउंडचे प्रमाण वाढते. ते प्रमाण २५ टक्क्यांपेक्षा अधिक नको. नाही तर तपासणीत असे तेल आढळले तर त्या विक्रेत्यावर दंडात्मक व गुन्ह्याचे स्वरूप मोठे असेल तर तुरुंगवासही होऊ शकतो. अशा तेलात नवीन तेल ओतून ते पुन्हा वापरले जाते.
तेलाच पुनर्वापर आरोग्याला घातक
भजी, वडे, सामोसे, पुऱ्या असे अनेक पदार्थ तेलात तळून विकले जातात. अशा तेलातील पदार्थ खाल्ल्यानंतर मानवाच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढवितात. वारंवार वापरलेल्या पदार्थापासून हृदयाला व मूत्रपिंड विकाराचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तज्ज्ञही असे तेल वापरू नका, असा सल्ला देत आहेत.
रस्त्यावरचे पदार्थ न खाल्लेलेच बरे
रस्त्यावरच्या पदार्थांकरिता वारंवार तळलेले तेल वापरले जाते. त्यात पोलर कम्पाउंडचे प्रमाण २५ टक्क्यांपेक्षा अधिक असते. त्यामुळे घसा, पोट, मूत्रपिंड किंबहुना कर्करोगालाही आमंत्रण मिळू शकते. त्यामुळे असे पदार्थ न खाल्लेलेच बरे, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.
...तर होईल गुन्हा दाखल
अन्न व औषध प्रशासन खात्यानेही अशा खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. वारंवार तळलेल्या तेलाचा पुनर्वापर केल्यास त्या तेलाचे नमुने अन्न व औषध प्रशासन विभागाने घेण्यास सुरुवात केली आहे. या तेलात पोलर कम्पाउंडचे प्रमाण २५ टक्क्यांपेक्षा जास्त आढळल्यास त्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविले जातात. अहवालानंतर त्या विक्रेता, हाॅटेलवर दंडात्मक कारवाई केली जाते. त्यातून गंभीर असेल तर गुन्हा दाखल केला जातो. अशा गुन्ह्यात दोषी आढळल्यास तुरुंगवासही भोगावा लागू शकतो.
- टी.यू. शिंगाडे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन (अन्न)
घरचे अन्न कायम चांगलेच
वडे, भजी, पुऱ्या, सामोसे, कचोरी असे पदार्थ घरातील तेलात एकदाच तळून खाल्ले तर त्यापासून आरोग्यास धोका उद्भवत नाही. तळण्याची व तेल वापरण्याची प्रक्रिया आपण स्वत: किंवा घरातील मंडळी डोळ्यासमोर करतात. त्यामुळे असे पदार्थ खात्रीशीर खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडेच घ्यावेत.
- डाॅ. शरद पोवार, एम.डी.
केवळ एकाच खाद्यपदार्थ विक्रेत्यावर कारवाई
कोल्हापुरात अनेक खाद्य पदार्थ विक्रेते आहेत. त्यातील अनेक जणांच्या तेलाची तपासणी अन्न व औषध प्रशासनाकडून केली जात आहे. त्यापैकी एका साखळी खाद्यपदार्थ विक्रेत्याकडे असे वारंवार तळलेले तेल आढळले. त्याचा पोलर कम्पाउंड २५ टक्क्यांपेक्षा अधिक होता. त्यामुळे त्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अहवालानंतर त्या खाद्यपदार्थ विक्रेत्यावर कारवाई केली जाणार आहे.
कारवाई का होत नाही?
अनेक वडे, भजी, सामाेसा, कचोरी विक्रेते अशा वारंवार तळलेल्या तेलाचा वापर सर्रास करतात. तो करीत असताना नवीन तेल त्यात मिसळले जाते. त्यामुळे पोलर कम्पाउंड २५ टक्क्यांपेक्षा कमी होतो. त्यामुळे कारवाई करताना तपासणीत ते तेल तळण्यायोग्य असेच दिसते. याला टाॅपअप असेही म्हटले जाते. तरीही अशा खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी चांगले तेल वापरून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे थांबवावे, अशी मागणी सर्वसामान्यांतून होत आहे.