शिवराज लोंढे -सावरवाडी -‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ योजनेचा उडालेला बोजवारा... ना पाझर तलावांची उभारणी, ना पाणी योजनेचे प्रकल्प.... नैसर्गिक पाण्याचे स्रोत असूनही केंद्र व राज्य शासनाच्या दुर्लक्षामुळे सातेरी-महादेव (ता. करवीर) या ऐतिहासिक डोंगर भागातील गेली ६६ वर्षे पाच हजार एकर शेती पाण्यापासून वंचित राहिलेली आहे. पाण्याची सोय अजूनही उपलब्ध झाली नसल्यामुळे शेतीची उत्पादनक्षमता घटली गेली.परिसरातील २० गावांचा समावेश असलेल्या परिसरात भौगोलिक दृष्टिकोनातून पाच हजार एकर पडीक जमिनीला कायमस्वरूपी पाणी मिळत नसल्यामुळे उत्पादन क्षमता घटली आहे.डोंगर भागातील शेती ही पावसावर अवलंबून आहे. या परिसरात प्रामुख्याने पावसाळ्यात नाचणी, वरी, ज्वारी, भुईमूग, तूर, भात यासारखी पिके वर्षानुवर्षे घेतली जातात. शेतीला बारमाही पाणी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास खुंटला आहे.सातेरी-महादेव डोंगरी भागाला शासनाने तीर्थक्षेत्र ‘क’ दर्जा दिला आहे. या परिसरातील शेतकऱ्यांची जमीन ही पावसावर अवलंबून आहे. दऱ्या-खोऱ्याचा भाग असलेल्या या भागात पाझर तलावांची उभारणी झालेली नसल्यामुळे पाच हजार एकर शेती ओलिताखाली आणण्याचे स्वप्न भंगले आहे. धोंडेवाडी ते केकतवाडी, शिरोली दुमाला ते केकतवाडी, गणेशवाडी ते केकतवाडी, नरगेवाडी ते शिरोली, बेरकळवाडी ते सडोली, आदी गावांच्यामध्ये मोठमोठ्या दऱ्या आहेत; पण केंद्र व राज्य शासनाने या परिसरात पाझर तलाव उभारणीकडे दुर्लक्ष केले आहे. सातेरी-महादेव डोंगर भागात तलावांच्या उभारणीची खरी गरज आहे. डोंगरी भागातील शेतकऱ्यांनी शेती पाण्याखाली आणण्यासाठी लढ्यात उतरले पाहिजे. पाच हजार एकर शेती ओलिताखाली आणली, तर डोंगरी भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल. पाण्यासाठी चळवळ उभारणे गरजेचे आहे. - राजेंद्र सूर्यवंशी, करवीर पंचायत समिती सदस्य व उद्योगपती
पाच हजार एकर शेती पाण्यापासून वंचित
By admin | Updated: April 10, 2015 00:26 IST