शिवाजी पेठेतील एका सामाजिक कार्यकर्त्यांच्या बाबतीत आलेला अनुभव तर कोरोना महामारीतील सावळ्या गोंधळाची साक्ष देणारा आहे. कोणतीही लक्षणे नसताना महापालिकेच्या पथकाने केलेल्या ॲन्टिजन चाचणीत हा कार्यकर्ता व त्याची पत्नी पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. मनात शंका होतीच, म्हणून त्यांनी ‘आरटीपीसीआर’ चाचणी करुन घेतली. त्याचा अहवाल येईपर्यंत दाेन दिवस गेले. त्या दोन दिवसात त्यांना खासगी डॉक्टरनी रक्ताच्या चाचण्या, ‘एचआरसीटी’ करायला सांगितले. आपल्या रुग्णालयात ॲडमिट व्हा, असा सल्लाही त्यांनी दिला. डॉक्टरनी सांगितलंय म्हणून प्रथम त्यांनी ‘एचआरसीटी’ केले. दोघांचे मिळून सहा हजार रुपये बिल झाले. एकाचा स्कोर पाच व दुसऱ्याचा स्कोर नऊ आला. रक्ताचे नमुने घेण्यासाठी दोन डॉक्टरांनी लॅब टेक्निशियनना पाठवले. एकाने फी सांगितली आठ हजार रुपये तर दुसऱ्याने सांगितली बारा हजार रुपये ! रक्ताची चाचणी एकसारखीच पण फी मात्र दोघांची वेगवेगळी ! शेवटी ‘आरटीपीसीआर’चा अहवाल आल्यावर सांगतो म्हणून त्या लॅब टेक्निशियनना परत पाठवले. दोन दिवसांनी अहवाल आला आणि दाेघांना सुखद धक्का बसला. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. शेवटी नात्यातील डॉक्टरांनी यात लक्ष घातले, आधार दिला. घरी थांबून राहा, असे सांगून त्यांनीच रोगप्रतिकारशक्ती वाढण्याची औषधे दिली. आता ते दोघेही ठणठणीत आहेत.
आधी पॉझिटिव्ह, नंतर निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:17 IST