कोल्हापूर : कोल्हापूर शहरात ६५ ठिकाणी १६५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम शनिवारपासून सुरू करण्यात आले. हे काम डिसेंबर २०१५ अखेर पूर्ण होणार असून त्यासाठी राज्य शासनाकडून साडेसहा कोटींचा निधी मंजूर झाला आहे. गेल्या एक वर्षापासून ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. सीसीटीव्ही यंत्रणा सुरू झाल्यानंतर कोल्हापूरची सुरक्षा भक्कम होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.मनोजकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यात मुंबई, पुण्यापाठोपाठ कोल्हापूरमध्ये बॉम्बस्फोट आणि गोळीबारासारख्या घटना घडू लागल्याने शहर असुरक्षित बनले आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत बनली आहे. शहराच्या सुरक्षेसाठी गेल्या दहा वर्षांपासून सीसीटीव्ही प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत; परंतु त्याला आतापर्यंत मुहूर्त सापडला नव्हता. शहरात सीसीटीव्ही बसविल्यानंतर त्याचे फायदे काय होणार आहेत, याचे सादरीकरण महापालिकेत करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांनी हा प्रकल्प राबविण्यासाठी पुढाकार घेत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, आयुक्त पी. शिवशंकर व स्थायी समितीचे सभापती आदिल फरास यांच्याशी बैठक करून सीसीटीव्ही प्रकल्पासाठी लागणाऱ्या निधीचा पाठपुरावा केला. त्यानुसार जिल्हा नियोजन मंडळाकडून दोन कोटी व महापालिकेतून साडेचार कोटी असा सुमारे साडेसहा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. त्यानुसार मुंबईच्या एम.आय.पी.एल. कन्सल्टन्सीच्या तज्ज्ञांनी कोल्हापूर शहराचा सर्व्हे केला. व त्यांनी सुचविलेल्या ठिकाणी कॅमेरे बसविण्याचे काम शनिवारी सुरु झाली. पोलिस अधीक्षक शर्मा यांनी या कांही ठिकाणांना महापालिकेचे अभियंता सुरेश पाटील, समर्थ सिक्युरिटी कंपनीचे संतोष मयेकर, योगेश लाड यांच्यासह प्रत्यक्ष भेटी दिल्या व योग्य त्या सूचना केल्या. (प्रतिनिधी) येथे बसणार कॅमेरे शिवाजी पूल, टाऊन हॉल, शिवाजी पुतळा, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेश, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, व्हीनस कॉर्नर, दाभोळकर कॉर्नर, कावळा नाका, तावडे हॉटेल, कसबा बावडा, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, धैर्यप्रसाद हॉल, ताराराणी पुतळा, शाहू नाका, बागल चौक, राजारामपुरी, सायबर चौक, शिवाजी विद्यापीठ, टाकाळा आदींसह ६५ ठिकाणी. पानसरेंचे मारेकरी सापडले असते.. हा प्रकल्प यापूर्वीच शहरात पूर्ण झाला असता तर ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकरी शोधण्यात पोलिसांना यश आले असते. फारसे चांगल्या दर्जाचे सीसीटीव्हीचे फुटेज न मिळाल्याने व ज्यांनी मारेकऱ्यांना प्रत्यक्ष पाहिले असा संशय आहे त्यांनी मारेकऱ्यांबध्दल माहिती न दिल्याने हा तपास ठप्प झाला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान हे कॅमेरे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आहेत. गुन्हेगारी घटना घडताच कॅमेरे आपोआप झूम होतात, संशयितांचे चेहरे व घटना नेमकी कशी घडली हे स्पष्ट दिसणार आहे. त्याची तपास कामात खूपच मदत होवू शकते. गणेश मिरवणूकीत वाद टाळण्यासाठीही उपयोग होवू शकतो. नगरसेवक रवि इंगवले यांनी बसविलेल्या कॅमेऱ्यातील चित्रीकरण गरज लागेल तेव्हा घेऊ, असेही अधीक्षकांनी स्पष्ट केले. फायदा काय... कॅमेऱ्यांमुळे शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवता येणार आहे. गुन्हेगारीविषयक घटनांवर ‘वॉच’ ठेवता येणे शक्य आहे. संपूर्ण हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मुख्यालयात स्वतंत्र कंट्रोल रूम केली असून, दोन शिप्टमध्ये २४ तास कर्मचारी असणार आहेत.
अखेर ‘सीसीटीव्ही’ला मिळाला मुहूर्त
By admin | Updated: August 23, 2015 17:54 IST