कोल्हापूर : शिरोली दुमाला (करवीर) येथील दोन कुटुंबात झालेल्या मारामारीत एकूण ३ जण जखमी झाले. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात परस्पर तक्रारीनुसार एकूण १६ जणांवर गुन्हा दाखल झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भाग्यश्री सुनील कांबळे (वय ३१, रा. शिरोली दुमाला) या धरणग्रस्त असून त्या शिरोली दुमाल्यात राहतात. त्यांचे पती सुनील हे गुरुवारी गोठ्यात जनावरांना पाणी पाजून बंडोपंत कांबळे यांच्याकडे भातमळणीस गेले असता संशयितांना चिडवून त्यांना काठीने मारहाण केली. यासह पुतण्या हर्षद कांबळे यालाही मारहाण केली. त्यात दोघेही जखमी झाले. याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार आदित्य उत्तम कांबळे, भारत कांबळे, रत्नदीप कांबळे, प्रकाश कांबळे, सुशांत कांबळे, बंडा (महाराज) कांबळे, बाळू कांबळे (रा. सर्व शिरोली दुमाला) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
राजरत्न मधुकर कांबळे (वय १९, रा. शिरोली दुमाला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भांडणे सोडविण्यास गेल्यानंतर शिवीगाळ व दगड फेकून मारले, तर चौकात बसलेले बंडा तायाप्पा कांबळे हे जखमी झाले. पोलिसांनी या प्रकरणी हर्षद विश्वास कांबळे, अभिजित प्रकाश कांबळे, गौरव गौतम कांबळे, ऋषिकेश रामचंद्र कांबळे, युवराज ऊर्फ सुनील दौलु कांबळे, दौलु रामचंद्र कांबळे, योगेश सिद्धार्थ कांबळे, तानाजी तुकाराम कांबळे, प्रतिराज विश्वास कांबळे (सर्व रा. शिरोली दुमाला, करवीर) यांच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास अंमलदार पाटील करीत आहेत.