महानगरपालिकेस जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी देण्यात पालकमंत्री पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून मतदार याद्या तयार करण्यात महापालिकेची सर्व यंत्रणा व्यस्त होती. त्यामुळे विकासकामांचे प्रस्ताव देणे शक्य झाले नव्हते. मात्र, ३१ मार्च जवळ येईल तसे प्रस्ताव तयार करण्याची धांदल उडाली. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा संपूर्ण प्रोजेक्ट विभाग प्रस्ताव तयार करण्याचा कामात व्यस्त होता.
दलित वस्ती सुधारणा योजनेतून अकरा प्रभागांत अकरा कोटींची विकासकामे केली जाणार आहेत. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शहरातील ऐतिहासिक तालमींच्या पुनर्बांधणी व दुरुस्तीसाठी दोन कोटींचा निधी आणला आहे. पालकमंत्री पाटील यांनी शहरातील वाहतूक व्यवस्थापनासाठी निधी देण्याचे मान्य केले आहे. त्याचे प्रस्ताव तयार केले आहेेत.