कोल्हापूर : कुटुंबातील दिवंगत व्यक्तींच्या श्राद्धाचा कालावधी समजल्या जाणाऱ्या पितृ पंधरवड्याला मंगळवारपासून सुरुवात झाली. या कालावधीत त्या त्या तिथीला दिवंगत व्यक्तीच्या नावे पूजा करून त्यांचा कृपाशीर्वाद कुटुंबावर राहावा, घरातील सर्व दोष निघून जावेत, अशी प्रार्थना केली जाते.
अनंत चतुर्दशीनंतर एक दिवसाने महालय म्हणजेच पितृ पंधरवड्याला सुरुवात होते. या दिवसापासून अमावास्येपर्यंतचे पंधरा दिवस प्रत्येक कुटुंबातील दिवंगत व्यक्तींच्या नावे महालय (अपभ्रंष महाळ) केले जाते. व्यक्तीचे निधन झाले त्या तिथीला त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून आवडत्या पदार्थांचा नैवेद्य केला जातो. या काळात कावळ्याला विशेष महत्त्व आहे, नैवेद्य कावळ्याने खाल्ला तर तो पितरांपर्यंत पोहोचतो, अशी श्रद्धा आहे. तसेच कुटुंबात काही दोष असले, तर त्यासाठी त्रिपिंडी, नारायण नागबळी असे विधी केले जातात. जिल्ह्यातील नृसिंहवाडी येथे मोठ्या प्रमाणात हे विधी केले जातात. हा काळ पितरांचा मानला .त्यामुळे कोणतेही शुभकार्य केले जात नाही. सर्वपित्री अमावास्येला हा कालावधी संपतो. त्यानंतर घटस्थापना होऊन नवरात्रौत्सवाला सुरुवात होते.
----