चंदगड : राज्यात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली असून तालुक्यातील काँग्रेस, भाजप, शिवसेनेने मात्र अजून आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत. त्यामुळे आघाडीत बिघाडी होणार काय? असा संशय कार्यकर्त्यांतून व्यक्त केला जात आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आहे. आघाडीत ठरल्याप्रमाणे यापुढील सर्वच निवडणुका भाजपला शह देण्यासाठी महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली लढण्याचे ठरले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसने तालुक्यात आढावा बैठक घेऊन आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याचा संशय बळावला आहे.
राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष वरिष्ठ पातळीवर गुण्यागोविंदाने नांदत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, त्याउलट परिस्थिती तालुक्यात पहावयास मिळत आहे. मुख्य प्रतिस्पर्धी भाजपाला सोडून एकमेकांचे पाय ओढण्याची संधी तिन्ही पक्ष सोडत नसल्याचेही दिसत आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस अशी चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांना संधी मिळणार आहे. त्याचा फायदा उठविण्यात कोण यशस्वी होणार त्याच्याच गळ्यात विजयाची माळ पडणार आहे.
प्रतिक्रिया
आगामी जि. प. व पं. समिती निवडणुकीची तयारी जोरात सुरू असून गणपती विसर्जनानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची भूमिका घेऊन लोकांसमोर जाणार आहे.
- नामदेव पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष
प्रतिक्रिया
पक्षाचा आदेश आल्यास आम्हीही स्वबळावर आगामी निवडणुका लढवू. याबाबत गणेशोत्सव काळात काँग्रेसचा मेळावा घेणार असून त्यामध्ये पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर करणार आहे.
संभाजीराव शिरोलीकर, तालुका काँग्रेस अध्यक्ष
प्रतिक्रिया
गेल्या जि. प. व पं. समिती निवडणुकीत कोणतेही पाठबळ नसताना थोडक्याच मतांनी आमचे उमेदवार पराभूत झाले होते. आता तर राज्यात शिवसेनेचे सरकार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश आल्यास स्वबळावर लढण्यास आम्हीही तयार आहोत.
संग्राम कुपेकर, शिवसेना चंदगड विधानसभा संघटक