लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व सर्व राज्य पुरस्कृत आवास योजनांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी व त्यामध्ये गुणवत्ता आणण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या महाआवास अभियान (ग्रामीण)ला ५ जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. लाभार्थ्यांना पावसाळ्यापूर्वी गृहप्रवेश करता येण्यासाठी उर्वरित घरकुलांचे काम गुणवत्तापूर्ण आणि जलदगतीने पूर्ण करण्यात यावे अशा सूचना सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पावणे चार लाख लाभार्थ्यांना गॅसजोडणी
अभियान कालावधीमध्ये पूर्ण झालेली घरकुले तसेच आधीच्या काळात पूर्ण झालेली परंतु कृतीसंगमाचा लाभ न मिळालेल्या घरकुलांना स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ७ लाख १० हजार ७८२ लाभार्थ्यांना शौचालयाचा लाभ दिला आहे. जलजीवन मिशनअंतर्गत ४ लाख ७३ हजार ६०५ लाभार्थ्यांना नळाद्वारे पाणीपुरवठा, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत ३ लाख ७४ हजार ९२४ लाभार्थ्यांना गॅस जोडणी, सौभाग्य योजनेअंतर्गत ३ लाख ४८ हजार ७७ लाभार्थ्यांना वीजजोडणीचा लाभ दिल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
९२१ बहुमजली इमारतींची उभारणी
राज्यामध्ये ३७८ घरकुल मार्ट सुरू आहेत. लाभार्थ्यांना आदर्श घरकुलांची ओळख करून देण्यासाठी २४२ डेमो हाउसची निर्मिती केली आहे. यामध्ये प्रामुख्याने घरकुल बांधकामासाठी जागा नसणाऱ्या लाभार्थ्यांकडे विशेष लक्ष देऊन ४३ हजार १९७ लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. पुरेशी जागा नसलेल्या लाभार्थ्यांसाठी बहुमजली इमारती निर्माण करण्यात येत आहेत. आजअखेर ९२१ बहुमजली इमारतींची (जी २) निर्मीती करण्यात आली आहे. तसेच जेथे पुरेशी जागा उपलब्ध आहे अशा ठिकाणी सर्व सोयी-सुविधांनी युक्त असे २१६ गृहसंकुल उभारण्यात आले आहेत.
६ हजार गवंड्यांना घरकुल बांधकामाचे प्रशिक्षण
घरकुलांची कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी ग्रामीण गवंडी प्रशिक्षण राबविण्यात येत आहे. यामध्ये आतापर्यंत ६ हजार १६५ गवंडी प्रशिक्षीत करण्यात आले असून १५ हजार ८५५ गवंडी प्रशिक्षण प्रगतीपथावर असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.