कोल्हापूर : मॉलमध्ये फिरण्यासाठी, मोठ्या कंपनीत कामगारांवर लक्ष ठेवण्यासह उत्पादनांची पाहणी करण्याच्या उद्देशाने संजीवन इंजिनिअरिंग अॅँड टेक्नालॉजी इन्स्टिट्यूशनच्या चार विद्यार्थ्यांनी अनोख्या अशा सुटकेस कारची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे पर्यावरणाच्या सर्व दृष्टिकोनांतून बॅटरीवर चालणारी ही कार त्यांनी बनविली आहे. बी. ई. (आॅटोमोबाईल) अंतिम वर्षातील अमय गांगण, जुबेर बांगी, आलम फरास, मनीष पाटील यांनी ही कार बनविली आहे. वाढत्या वाहतुकीच्या समस्येमुळे पार्किंगमध्ये होणारे अडथळे समोर ठेवून या विद्यार्थ्यांनी या सुटकेस कारची निर्मिती केली आहे. ३५ किलो वजनाची ही कार कुठेही सहज घेऊन जाता येते. यामध्ये ४८ व्होल्टची मोटर बसविण्यात आली आहे. या कारमध्ये बारा व्होल्टची बॅटरी आहे. ती चार तासांमध्ये चार्जिंग होते. कारची गती ताशी २० किलोमीटर आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ४० किलोमीटरपर्यंत धावू शकते. या सर्वांना चेअरमन पी. आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले, प्राचार्य एम. जी. देवमाने, विभागप्रमुख एस. एल. घोडके, प्रकल्प मार्गदर्शक प्रा. एम. एम. बेपारी यांचे मार्गदर्शन लाभले. शंभर किलोंची वाहतूक साधारणपणे या सुटकेस कारवरून एक माणूस सहज फिरू शकतो. याला सायकलीप्रमाणे हॅँडल व ब्रेक आहेत. शंभर किलो वजन वाहण्याची सोयदेखील आहे. ही कार बनविण्यासाठी तेरा हजार रुपये खर्च आला आहे. एक महिन्याच्या कालावधीत ही कार तयार झाली. वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी हे वाहन उत्तम आहे.
अनोख्या सुटकेस कारची सफर
By admin | Updated: April 27, 2015 00:18 IST