लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : दोन्ही कॉंग्रेसनी प्रचंड महत्त्वाची खाती घेऊन आपला पारंपरिक कारभार सुरू ठेवला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी कोणाला थोबाडीत जरी मारली तरी कोणीही सत्तेतून बाहेर पडणार नाही, असे मित्र असलेला कॅबिनेट मंत्री माझ्याजवळ बोलला आहे, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कोणत्याही धमक्यांना आम्ही घाबरत नाही, असेही त्यांनी सांगितले.
कोल्हापुरात शनिवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर उत्तरे देताना महाविकास आघाडीला टीकेचे लक्ष्य केले. ते म्हणाले, १२ बलुतेदार आणि नव्या १८ क्षेत्रांतील असंघटित कामगारांना दरमहा पाच हजार रुपये द्या, अशी भाजपची मागणी आहे. यासाठी ५० हजार कोटी लागणार आहेत. आम्ही पुण्यात रिक्षाचालक, शालेय बसेसचे चालक यांना दरमहा काही निधी देतो. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजप कार्यकर्त्यांना खोट्या केसीस टाकून हैराण केले जात आहे. जरा मनाविरुद्ध वागले की आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या होताहेत. कोविड आचारसंहितेचा सोयीनुसार वापर सुरू आहे.
चौकट
भुजबळांची इमारत जप्त झाली त्याचे काय?
खालच्या कोर्टात दोषारोप सिद्ध झाले नाहीत म्हणून भुजबळ आणि राष्ट्रवादी ढोल बडवत आहे. याच वेळी त्यांची मुंबईतील १०० कोटींची बेनामी इमारत जप्त झाली त्याचे काय? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.
चौकट
कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा
मुंबई आणि पुण्यातील बलात्काराच्या घटना पाहता, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. कायद्याचा धाक राहिलेला नाही. बलात्कार करणाऱ्यांना लवकर अटक होत नाही. झाली तर दोन दिवसांत जामीन होतो. त्यामुळे धाडस वाढले आहे. मुख्यमंत्र्यांनी याचे मॉनिटरिंग केले पाहिजे असे पाटील यांनी सांगितले.
चौकट
मुश्रीफ यांची वृत्ती...
कोल्हापूरच्या शेजारील गावांची मानसिकता पाहून आम्ही प्राधिकरण तयार केले. नंतर आमचे सरकार गेले; परंतु तुमचे सरकार येऊन २२ महिने झाले. तुम्ही प्राधिकरणाला किती निधी दिला, असा उलट सवाल पाटील यांनी उपस्थित केला. आंबेओहोळसाठी फडणवीस यांच्याशी भांडून निधी लावून घेतला; परंतु मुश्रीफ यांची वृत्तीच ‘खोटं बोल खरं रेटून बोल’ अशी आहे, त्याला काय करणार? असा टोला पाटील यांनी लगावला.