संदीप खवळे - कोल्हापूर -‘संपुआ’ सरकारच्या काळात सुरू झालेल्या आर्थिक समावेशन योजनेत प्रत्येक गावाला बँकिंगच्या कक्षेत आणण्यासाठी खाती सुरू करण्यात आली. आता जनधन योजनेमध्ये प्रत्येक कुटुंबाला बँकिंगच्या प्रवाहात आणण्यासाठी विमा योजना आणि ओव्हर ड्राफ्टची सुविधा केंद्र शासनाने जाहीर केली आहे. बँकिंगच्या वाढत्या विस्ताराबरोबरच विविध योजनांमुळे हजारोजणांना कंत्राटी स्वरूपात का असेना; पण रोजगार मिळत आहे. मिनी बँकिंग सेंटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘किआॅस्क सेंटर’च्या माध्यमातून हजारोजणांना रोजगार मिळाला आहे. जनधन योजनेत बँक मित्र नेमण्याची सक्तीच असल्यामुळे अनेक बँकांनी बँक मित्रांची नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे. काही बँकांत आधीपासूनच ही संकल्पना अस्तित्वात आहे. लीड बँक आॅफ इंडियाचे १२४ बँक मित्र सध्या जिल्ह्यात कार्यरत आहेत. तसेच या बँकेची सर्वाधिक २६ किआॅस्क सेंटर कार्यरत आहेत. या सेंटरच्या माध्यमातून अर्जदारांची खाती उघडणे, त्यांना कर्जपुरवठ्याची माहिती देणे, २० हजार रुपयांपर्यंतची रक्कम देणे, तसेच ४० हजार पर्यंतची रक्कम जमा करून घेण्याची कामे करण्यात येत आहेत. आर्थिक व्यवहारासाठी या बँक मित्रांना हँड हेल्ड डिव्हाईस देण्यात आली आहे. त्यामुळे बँकांवरील ताण कमी झाला आहे. तसेच हजारोजणांना रोजगार मिळाला आहे. कर्ज, ठेवी, कर्जवसुली आणि खाती उघडणे, यासाठी या सेंटरमधील बँक मित्रांना कमिशन दिले जाते. काही बँक मित्र प्रतिमाह तब्बल ३५ हजार रुपये कमिशन मिळवत आहेत. जनधन योजनेंतर्गत २६ डिसेंबरपर्यंत खाती उघडण्याची डेडलाईन देण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेंतर्गत खाती उघडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या २६ जानेवारीला मोदी सरकारला जनधन योजनेचा तपशील जाहीर करावयाचा आहे. त्यामुळे बचत गट, बँक मित्र आणि बँक यांच्या माध्यमातून जनधन चळवळ जोर धरत आहे. या योजनेत विमा लाभाची तरतूदही लागू आहे. विम्याचा लाभ मिळण्यासाठी ४५ दिवसांतून किमान एकदातरी खात्यावर व्यवहार करावे लागणार आहेत. तसेच रूपे कार्डचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे साहजिकच जनधन योजना पूर्णत्वास येईपर्यंत सहा महिने या बँक मित्रांना सातत्याने रोजगार मिळणार आहे. बँकांतील वाढती स्पर्धा, विविध योजनांसाठी बँक खात्याची सक्ती, आधार लिंकिंग, यामुळे कंत्राटी स्वरूपात रोजगार उपलब्ध होत आहे. बँक मित्र नेमण्याची सक्ती जनधन योजनेंतर्गत खाती उघडण्यासाठी बँकांना बँक मित्र नेमण्याची सक्ती शासनाने केल्यामुळे जिल्ह्यातील लीड बँकेच्या कार्यकक्षेत येणाऱ्या सुमारे ५३१ शाखांच्या माध्यमातून दीड हजार तरुणांना रोजगाराची संधी मिळाली आहे. किआॅस्क सेंटरच्या माध्यमातून बँकिंगची बरीचशी कामे होत असल्यामुळे बँकेवरील कामाचा ताण कमी होत आहे. - एम. जी. कुलकर्णी, व्यवस्थापक बँक आॅफ इंडिया, कोल्हापूर.
‘जनधन’मुळे मिळणार रोजगार -
By admin | Updated: December 17, 2014 23:56 IST