इचलकरंजी : नगरपालिकेच्या विविध विषय समिती निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी गतिमान झाल्या आहेत. ताराराणी पक्षाची सत्तेत येण्यासाठी धडपड सुरू आहे. त्याचबरोबर आवाडेंसोबत नसलेल्या काँग्रेसच्या नऊ नगरसेवकांनी पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतल्याचे समजते, तर सत्तेतील समीकरणासंदर्भात हाळवणकर-कारंडे यांचीही चर्चा झाली आहे. ताराराणी पक्षाच्या बैठकीत नगरपालिकेत सत्तेत सहभागी होण्याच्यादृष्टीने हालचाली करण्यासाठी तिघांची समिती नेमण्यात आली आहे. त्यामध्ये संभाजी नाईक, जयवंत लायकर व चंद्रकांत शेळके यांचा समावेश आहे. त्यामुळे राजर्षी शाहू आघाडीला बाजूला ठेवले जाईल का, अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे याबाबत कारंडे व हाळवणकर यांचीही बैठक होऊन सत्ता कायम ठेवण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. तर काँग्रेसमधील आवाडे यांच्यासोबत असलेल्या नऊजणांची बैठक झाली, तर उर्वरित नऊजण बाजूला राहिले. त्यामुळे त्यांनी पालकमंत्री पाटील यांची भेट घेऊन स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे. आज, मंगळवारी घडणाऱ्या घडामोडींवरच चित्र स्पष्ट होणार आहे.
विषय समित्यांच्या निवडीवरून बैठकांचा जोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:18 IST