शिवाजी गोरे- दापोली --दाभोळ गावापासून जवळ असणाऱ्या एका गावातील वाडीने विष्णू मायनाक यांच्या कुटुंबाला दोन वर्षे वाळीत टाकले होते. वाळीत टाकलेल्या कुटुंबाशी बोलणाऱ्या व्यक्तिला वाडीने पाच हजार रुपये दंड जाहीर केला होता. वाळीत कुटुंबियांशी सर्व व्यवहार बंद असल्याने आपण माणूस असूनसुद्धा समाजाकडून पशू-प्राण्यांसारखी वागणूक देण्यात येत असल्याचे दडपण येऊन मायनाक यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. परंतु दापोलीतील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यानी वेळीच हस्तक्षेप करुन घरवापसी केल्याने एक कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून बचावले आहे.बैठकीत न आल्याने दाभोळनजीकच्या एका गावातील वाडीने मुंबईतील एकाला वाळीत टाकले. मात्र, त्याचा एक भाऊ गावातच राहात आहे. त्याला वाडीने बैठकीत तुला भाऊ हवाय की वाडी हवीय? असा प्रश्न उपस्थित केला. विष्णू मायनाक यांनी आपल्याला भाऊ हवाय, असे उत्तर देताच वाडीतील प्रमुख मंडळींच्या संतापाचा पारा चढला. त्याच बैठकीत विष्णू मायनाक यांना वाळीत टाकण्याचा निर्णय झाला. त्याच्याशी कोणीही बोलू नये किंवा कोणताही व्यवहार करु नये. तसे केल्यास पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास त्या कुटुंबाला वाळीत टाकण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे गेली दोन वर्षे मायनाक कुटुंब दडपणाखाली जीवन जगत होते. त्यामुळे दडपण येऊन आपण आपले जीवन संपवून घेतले तर आपली पत्नी व मुलींना वाडी सामावून घेईल, या विचाराने दोनवेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची कबुली मायनाक यांनी दिली.त्यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर, अनिश पटवर्धन यांना झालेला प्रकार सांगितला. दाभोळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नवनाथ जगताप यांनी वाडीतील प्रमुखांना व फिर्यादीला दाभोळ येथे बोलावून घेतले. बैठकीत दोन्ही बाजू ऐकून घेत कायद्याने कोणालाही वाळीत टाकणे गुन्हा असल्याची जाणीव करून दिल्यानंतर हा बहिष्कार मागे घेण्यात आला.अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने घर वापसी.दाभोळ पोलीस उपनिरीक्षक नवनाथ जगताप यांची भूमिका निर्णायक.
‘अंनिस’मुळे वाळीत प्रकरणातून सुटका
By admin | Updated: August 31, 2015 21:17 IST