कोल्हापूर : जिल्ह्याचा प्रारूप प्रादेशिक आराखडा २१ सप्टेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यावर हरकती व सूचना घेण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून, यानंतर हा आराखडा अंतिम होणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात प्रादेशिक आराखड्यासह विविध बैठका झाल्या. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.विभागीय आयुक्त चोक्कलिंगम म्हणाले, प्रादेशिक आराखड्यासंदर्भात नियुक्त मंडळाची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. तत्पूर्वी आराखड्याशी संबंधित पर्यावरण, पुरातत्त्व, दळणवळण, औद्योगिक समित्यांकडून आढावा घ्यायचा होता. त्यानुसार या ठिकाणी या समितीच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन त्यांच्या सूचना घेण्यात आल्या आहेत. या सूचनांवर मंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन २१ सप्टेंबरला प्रारूप प्रादेशिक आराखडा प्रसिद्ध केला जाणार आहे. यावर हरकती व सूचना मागविण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी ठेवण्यात आला आहे. या काळात सूचना व हरकती प्राप्त झाल्यावर त्यावर निर्णय घेऊन तो अंतिम केला जाईल.हद्दवाढीत समाविष्ट करण्यासाठी प्रस्तावित असणाऱ्या गावांसाठी राज्य शासनाने प्राधिकरणचा प्रस्ताव दिला आहे. याचा परिणाम प्रादेशिक आराखड्यावर होईल का? अशी विचारणा चोक्कलिंगम यांना केली असता ते म्हणाले, या ठिकाणी प्राधिकरण करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. याच्या नियोजनासाठी पुढील किमान तीन वर्षांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. तोपर्यंत प्रादेशिक आराखड्यासाठी करण्यात येणारे नियोजन थांबवून चालणार नाही. तसेच या प्राधिकरणसाठी प्रादेशिक आराखड्याचा कोणताही अडथळा येणार नाही. प्राधिकरणाच्या प्रक्रियेबरोबरच आराखड्यानुसार विकासाचे कामही सुरू राहील.ते म्हणाले, स्वच्छता अभियानात कोल्हापूर जिल्हा राज्यात आघाडीवर असून, यासाठी जिल्हा परिषदेने चांगले काम केले आहे. कोल्हापूरसह सांगली व सातारा या तीन जिल्ह्णांसाठी असणारे ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र हे सांगलीला हलविण्याचे प्रयत्न सुरू होते, परंतु ते कोल्हापुरातच राहावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. त्याला यश येऊन या प्रक्रियेला स्थगिती मिळाली आहे.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे, उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, नगररचना विभागाचे उपसंचालक मो. र. खान, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)प्रदुषणमुक्त गणेशोत्सव साजरा करागणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर पंचगंगा नदीचे प्रदूषण होऊ नये याची खबरदारी सर्व नागरिकांनी घेतली पाहिजे. यासाठी गतवर्षी चांगला प्रतिसाद मिळाला असून, यंदा शंभर टक्के प्रदुषणमुक्त गणेशोत्सव करण्याचा प्रयत्न करूया. गणेश विसर्जनासाठी जिल्हा परिषद व महापालिका यांनी योग्य नियोजन केले आहे, त्याला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त चोक्कलिंगम यांनी नागरिकांसह गणेशोत्सव मंडळांना केले आहे.
प्रारूप प्रादेशिक आराखडा २१ सप्टेंबरला :
By admin | Updated: September 9, 2016 01:13 IST