विद्यापीठाचे यशवंतराव चव्हाण अध्यासन आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटतर्फे ‘डॉ. गेल ऑम्वेट: सैद्धांतिक आकलन व योगदान’ या विषयावर आदरांजली सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, तर प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारत पाटणकर, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर प्रमुख उपस्थित होते. गेल ऑम्वेट या कोणत्याही अवांतर अभिनिवेशाविना भारतीय ग्रामीण समाजजीवनाशी निष्ठेने आणि मनापासून एकजीव झाल्या. चळवळीचा पिंड कायम ठेवून तिचे सिद्धांतन करण्याचे कौशल्य त्यांना साधले होते. मानवी अस्तित्वासंबंधाने नवे सिद्धांत उभे करणे आणि पूर्णत: मानुष होणे हे त्यांचे जीवनध्येय होते, असे डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले. सैद्धांतिक मांडणी करणारे खूप असतात; पण, सिद्धांत उभे करणारे दिसत नाहीत. डॉ. गेल या अशा सिद्धांत उभे करणाऱ्यांपैकी होत्या. माती, पाणी, स्त्री आणि विठ्ठल-बुद्ध या चार पायांवर त्यांनी आपल्या सिद्धांताला सक्षमपणे उभे केले होते, असे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी सांगितले. यावेळी डॉ. एस. एन. पवार, एस. एस. महाजन, पी. एस. कांबळे, भारती पाटील, रणधीर शिंदे, मेघा पानसरे, जगन कराडे यांनी मनोगते व्यक्त केली. डॉ. प्रकाश पवार यांनी प्रास्ताविक केले. अमोल मिणचेकर यांनी सूत्रसंचालन केले.
स्मृती जपण्यासाठी विद्यापीठ कार्यरत
डॉ. गेल यांनी संशोधनाचा उपयोग सामाजिक चळवळींना अधिष्ठान देण्यासाठी करणे आणि सामाजिक चळवळींबाबतचे संशोधन पुन्हा पुढे नेणे, अशी दुहेरी जबाबदारी यशस्वीरित्या पेलली होती. विद्यापीठ परिवार त्यांच्या स्मृती जपण्यासाठी विविध माध्यमांतून कार्यरत राहील, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. शिर्के यांनी दिली.
फोटो (२१०९२०२१-कोल-विद्यापीठ आदरांजली सभा) : शिवाजी विद्यापीठात मंगळवारी आदरांजली सभेच्या प्रारंभी सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गेल ऑम्वेट यांच्या प्रतिमेस कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शेजारी डावीकडून प्रकाश पवार, विलास नांदवडेकर, राजन गवस, भारत पाटणकर, पी. एस. पाटील उपस्थित होते.