उदगाव : आठवर्षीय बालकाचा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने उदगाव ग्रामस्थांतून संताप व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणी ग्रामपंचायतीने तातडीची बैठक घेऊन सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेला पत्र लिहिले आहे. महानगरपालिकेकडे असणारी डॉग व्हॅन व कुत्री पकडण्यासाठी रेस्क्यू पथक द्यावे, अशी विनंती उदगाव ग्रामपंचायतीने केली आहे.
सोमवारी (दि. १३) आठवर्षीय बालकाचा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला होता. कुत्र्यांची संख्या भरमसाट वाढल्याने त्यांची ग्रामस्थांत दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ग्रामपंचायतीने तातडीने निर्णय घेतला आहे. यासाठी लागणारा खर्च व व्यवस्था ग्रामपंचायत करणार आहे. दरम्यान, गावात शहरी भागातून भटकी कुत्री आणून सोडल्याचा संशय व्यक्त होत होता. यावरही ठोस मार्ग काढावा, अशी चर्चा बैठकीत झाली.