खानापूर येथे गावाला लागून वडाच्या माळात उत्तम भोई यांचे शेत आहे.या शेतात ऊस पीक आहे. या शेतात विजेचे खांब आहेत. सोमवार (दि. ३१) रोजी या खांबावरील एक विद्युतवाहिनी तुटून पडली होती.त्यांच्या लगतच्या शेतात प्रकाश भोई हे सकाळी काम करीत असताना तेथून एक कुत्रा उत्तम भोई यांच्या शेतातून जात असताना त्याचा धक्का त्या वाहिनीला लागला. विद्युत प्रवाह सुरू असल्याने तो कुत्रा जागीच गतप्राण झाला. ही घटना प्रकाश यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी सर्वप्रथम महावितरणला वीजपुरवठा खंडित करण्यासाठी सांगितले आणि जवळच्या शेतकऱ्यांना फोन करून आरडाओरडा करून सावध केले. त्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने वीज पुरवठा खंडित करून ती वाहिनी जोडून घेतली.गावालगत असलेल्या या शिवारात जनावरांना वैरण आणण्यासाठी एखादा शेतकरी जाऊ नये म्हणून प्रकाश यांनी जमेल तेवढ्या लोकांना फोन करून ही बाब निदर्शनास आणून दिली.पत्रकार प्रकाश भोई यांच्या प्रसंगावधानतेमुळे अनर्थ टळला.
घटनास्थळी खानापूरचे माजी सरपंच भुजंगराव मगदूम, तानाजी भोई, गौतम भौई, विनायक भोई,किरण पाटील, विक्रम घरपणकर यांनी घटस्थळी धाव घेऊन मदत केली. प्रसंगावधान दाखवून भयंकर घटना टाळल्याबद्दल प्रकाश भोई यांचे सर्वांनी आभार मानले.