लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकूळ‘मध्ये दूध उत्पादकांना ३,१३,२३ तारखेला दुधाची बिले देत असल्याचे सत्तारूढ गट सांगत आहे. गवळीदेखील दहा दिवसाला पैसे देतात, तुम्ही काय वेगळे करता. पैसे नाही दिले तर दूध कोण घालणार? शेणा-मुतात राबणाऱ्या मायमाऊलीच्या घामाचे ते पैसे आहेत, ते दिले म्हणजे काय उपकार करता का? असा सवाल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
‘गोकूळ’ला वैभव मिळवून द्यायला ते गेले होते काेठे? अशी विचारणा सत्तारूढ गटाच्या नेत्यांनी केल्याबाबत विचारले असता, मंत्री मुश्रीफ म्हणाले, वैभवाचा विषयच येथे नाही, ते म्हणतात ३,१३,२३ ला बिले देतो, गवळीसुध्दा दहा दिवसाला बिले देतात. पैसे दिले नाहीतर त्याला दूध कोण घालणार. आम्ही उसाची एफआरपी देतो म्हणजे काय उपकार करतो का? बिले देणे त्यांचे कामच आहे. मूळात ‘गोकूळ’मधील गैरव्यवहार किती दिवस चालणार, आपण उघड्या डोळ्याने किती दिवस बघायचे? म्हणून आमचा सकारात्मक प्रचार आहे. एकदा गोकूळ आपल्या हातात द्या आम्ही खर्च कमी करून पारदर्शीपणे कारभार करू. पाच-सहा वर्षांपूर्वी १३६ कोटी संचित तोट्यात असलेली जिल्हा बँक १५० काेटींच्या नफ्यात आणली, त्याप्रमाणे अतिशय पारदर्शी कारभार करून देशातील २७ व्या क्रमांकावर असणारा ‘गोकुल’ ‘अमूल’बरोबर काम करेल. लीटरला दोन रुपये जादा दिले नाहीतर पुढच्या निवडणुकीत शेतकऱ्यांनी दारात उभे करून घेऊ नये, असेही त्यांनी सांगितले.
महाडिकांकडून लोकांचा अपमान
महादेवराव महाडिक यांनी परवा आपण जिल्ह्याचा बाप असल्याचे वक्तव्य केले आहे. ते बाप आहेत, ताप आहेत की पाप, यावर खासदार संजय मंडलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र महाडिक यांनी असे बोलून लोकांचा अपमान केला आहे. असे बोलणे बरे न्हवे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
तर आपण टँकरही लावला नसता
‘गोकूळ’च्या प्रत्येक निवडणुकीत टँकरवर एवढ्या जोरात टीका होते, तरीही महादेवराव महाडिक जराही आपल्यात बदल करत नाहीत. आपण जर महाडिक यांच्या ठिकाणी असतो, तर एक टँकरदेखील लावला नसता. असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.