मुरगूड : मुरगूड (ता. कागल) येथील सर पिराजीराव तलाव बांधताना मुरगूड, शिंदेवाडी व यमगे या गावांतील नागरिकांचे योगदान मोठे असल्याने आणि या तिन्ही गावांना पिण्याचे पाणी मिळावे याच हेतूने या तलावाची उभारणी झाल्याने या तलावातील पिण्याच्या पाण्याचा हक्क आपण कदापि सोडणार नाही, असा निर्णय मुरगूड, यमगे, शिंदेवाडी या गावांतील नागरिकांनी घेतला. पाणीप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आलेल्या माजी जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ यांची मात्र यामुळे चांगलीच कोंडी झाली; पण तरीसुद्धा मुरगूड शहरासह यमगे आणि शिंदेवाडीचा पाणीप्रश्न सोडविण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर पिराजीराव तलावातील पाण्याच्या पातळीमध्ये कमालीची घट झाल्याने पाणी काटकसरीबाबत आणि पुढील वर्षापासून पाणी पुरवण्यासाठी असमर्थता तलाव प्रशासनाने पत्राद्वारे कळवल्याने याबाबत चर्चा करण्याबाबत पालिकेने सर्वपक्षीय तिन्ही गावांतील लोंकाची बैठक बोलावली होती. या बैठकीत अनेकांनी तलाव प्रशासनाने पिण्याचे पाणी दिलेच पाहिजे अशी भूमिका मांडली. अध्यक्षस्थानी ‘गोकुळ’चे संचालक रणजितसिंह पाटील होते. मुश्रीफ म्हणाले, मुरगूड शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता गृहीत धरून या तालुक्याचा आमदार या नात्याने आपण बैठकीचे आयोजन केले असून शासकीय प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार सर पिराजीराव तलावामध्ये सध्या २३ फूट पाणी असून सात ते आठ फूट गाळ असेल. त्यामुळे पाण्याची काटकसर आणि शेतीसाठी पाण्याचा पूर्णपणे वापर बंद केला तर हे पाणी या तिन्ही गावांना पुरणार आहे. तलाव भरण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत. आपण त्यासाठी पाच लाख रुपये निधी देऊ. नळांना मीटर, वार्डा-वार्डांमध्ये कूपनलिका मारण्यासाठी शासनाकडून निधी आणू. रणजितसिंह पाटील म्हणाले, या तलावावर आमचा हक्क आहे. पाण्यामध्ये कोणीही राजकारण करू नये. आम्हाला आमचे पाणी मिळावे.माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील म्हणाले, ३0 ते ३५ वर्षांपूर्वी प्रशासक असताना मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी व तलाव प्रशासन यांच्यामध्ये करार झाला, त्या कराराचे नगरपालिकेन कधीच उल्लंघन केलेले नाही. पाणी बचतीसाठी आपण पुरेपूर उपाय करू. याशिवाय तलाव भरण्यासाठी युद्धपातळीवर अवचितवाडी येथील तलावातून जादा पाणी या तलावात सोडण्याचे काम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.या बैठकीत उद्योगपती जोतीराम सूर्यवंशी, यमगेचे माजी सरपंच शिवाजीराव पाटील, शिंदेवाडीचे सरपंच दत्तामामा खराडे, माजी नगरसेवक संपत कोळी, सोमनाथ यरनाळकर, दिंगबर परीट, नगरसेवक सुहास खराडे, माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, दलितमित्र डी. डी. चौगले यांनी मनोगते व्यक्त केली. पाणीपुरवठा समिती सभापती संतोष कुमार वंडकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बैठकीस जि. प.चे माजी सदस्य युवराज पाटील, भैया माने, नगराध्यक्षा वसुधा कुंभार, माजी नगरसेवक एम. डी. रावण, गणपतराव फराकटे, माजी उपनगराध्यक्ष शामराव घाटगे, शामराव पाटील, साताप्पा पाटील, वसंतराव शिंदे, प्रा. चंद्रकांत जाधव, दगडू शेणवी, अॅड. सुधीर सावर्डेकर, अनंत फर्नांडीस, विलासराव गुरव, नामदेव भांदीगरे, किरण पाटील, दिनकर पोवार, शहर अभियंता प्रकाश पोतदार, रणजित पाटील या प्रमुखांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांनी आभार मानले. (वार्ताहर)अन्यथा नेत्यांना गाव बंद..मुरगूड हे जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर आहे. आतापर्यंत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कधीच भेडसावला नाही; पण पावसाची ओढ व तलाव प्रशासनाने पाठवलेले पत्र यामुळे लोकांच्यात नाराजी आहे. त्यामुळे शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तत्काळ मिटवा अन्यथा कोणत्याही नेत्याला शहरामध्ये येऊ देणार नाही, असा इशारा नगरसेवक संपत कोळी यांनी दिला.तलाव भरण्यासाठी प्रयत्न सुरूसर पिराजीराव तलावातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी अवचितवाडी तलावातून जादाचे पाणी नळ टाकून सोडण्याचे काम तत्काळ पालिका प्रशासनाने सुरू केले असून, या तलावामध्ये पाणी सोडण्याच्या निर्णय पालिकेने घेतला आहे.तलाव प्रशासन कार्यालयातील अधिकाऱ्यांना या बैठकीबाबत विचारले असता आपण आपल्या वरिष्ठांशी बैठकीची माहिती दिल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनानुसार माहिती देतो, असे सांगितले.
पिण्याच्या पाण्याचा हक्क सोडणार नाही
By admin | Updated: September 7, 2015 22:24 IST