कोल्हापूर : कोल्हापूरच्या टोलबाबत राज्य शासनाने समिती नेमली आहे. येत्या महिन्याभरात या प्रकल्पाची किंमत निश्चित होणार असल्याने टोल वसुलीबाबत गडबड करू नका, अशी सूचना आपण जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिल्याची माहिती कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.कोल्हापूरच्या टोलप्रश्नाबाबत आम्ही जनतेबरोबर आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी कोल्हापूरच्या रस्ते प्रकल्पाचे मूल्यांकन करण्यासाठी एक समिती तयार केली आहे. ही समिती या प्रकल्पाचा नेमका खर्च किती, या विषयीचा अहवाल शासनाला सादर करणार आहे. त्यानंतर हे पैसे आय.आर.बी.ला कसे द्यायचे, हे ठरवू. महिन्याभरात मूल्यांकनाचे काम पूर्ण होऊन या तिढ्याबाबत मार्ग काढण्यात निश्चित यश येईल. गृहराज्यमंत्री सतेज पाटील व आपण मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. सकाळीच जिल्हा पोलीस अधीक्षकांचा आपणाला फोन आला होता. आज दुपारपासून आय.आर.बी. कंपनी टोल सुरू करत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्पाच्या किमतीबाबत मतभेद आहेत. प्रकल्पाची नेमकी किंमत किती, हे मूल्यांकनातून महिन्याभरात कळेल. त्यानंतर यातून मार्ग काढला जाईल. तोपर्यंत टोलवसुलीची गडबड करू नका, अशी सूचना त्यांना केली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार के. पी. पाटील, सरचिटणीस अनिल साळोखे उपस्थित होते. गडकरी टोलमुक्त करतील भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी हे केंद्रीय रस्ते बांधकाम खात्याचे मंत्री आहेत. त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात महाराष्ट्र टोलमुक्त करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या टोलप्रश्नाबाबत ते निश्चित मदत करतील, अशी खिल्ली मंत्री मुश्रीफ यांनी उडवली.