कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांपासून थकीत असलेले पीएम किसान योजनेचे पैसे मिळावेत, अशी मागणी करनूर (ता. कागल) येथील शेतकऱ्यांनी शुक्रवारी जिल्हा प्रशासनाकडे केली. कृषी व महसूल यांच्यामध्ये पुरस्कार स्वीकारण्याच्या वादातून या योजनेचे काम रखडल्याची माहिती आहे, तरी यावर तोडगा काढावा, अशा आशयाचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शंकर जाधव यांना दिले. शिष्टमंडळात सचिन घोरपडे, आबासोा शिंदे, संतोष चौगुले, लक्ष्मण भंडारे उपस्थित होते.
येथील ४०० ते ५०० शेतकऱ्यांना गेल्या चार ते सहा महिन्यांचे पीएम किसान योजनेचे पैसे मिळालेले नाहीत. कागलमधील देना बँक व अन्य बँकांचे विलीनीकरण झाले आहे. या विलीनीकरणानंतर नवीन अकाऊंट नंबर अपडेट करणे गरजेचे आहे. बँकेने ही माहिती महसूलकडे दिली आहे. ग्रामस्थांनी तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतरही काही मार्ग काढला गेला नाही. शासनाच्या दोन विभागांच्या वादात सर्वसामान्य शेतकरी भरडला जात आहे. त्यामुळे यावर लवकर तोडगा काढून शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
---