लोकमत न्यूज नेटवर्क
कोडोली : कोडोली ग्रामपंचायतीने घरफाळा व पाणीपट्टीची थकीत असलेली अडीच कोटीची रक्कम वसुलीसाठी पाणी कनेक्शन बंद करण्याची धडक मोहीम राबविली. थकित रक्कम वसुलीसाठी काही मिळकतधारकांकडून प्रतिसाद न मिळता वाद घालण्याचे घटना घडत आहे. गुरुवारी दुपारी कर्मचारी व मिळकतधारक यांच्यात वाद झाल्याने ग्रामपंचायत सदस्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. ग्रामपंचायत सदस्य व मिळकतधारक यांच्यात वाद वाढतच गेल्याने अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले.
करापोटीची रक्कम अनेक मिळकतदार चार-पाच वर्षे भरीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोटींच्या घरात थकबाकी गेली आहे . वसुली प्रक्रियेत सदस्यांनी सहभाग घेत आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत थकीत २०० घराचे पाणी कनेक्शन तोडत घरफाळा वसुलीस सुरुवात केली असल्याचे उपसरपंच निखिल पाटील यांनी सांगितले.
यावेळी सरपंच मनीषा पाटील, ग्रामपंचायत सदस्य नितीन कापरे, माधव पाटील, प्रकाश पाटील, प्रकाश हराळे, बाजीराव केकरे, डॉ प्रशांत जमने, अजित पाटील, रणजित पाटील, नितीन कुंभार, ग्रामसेवक ए. वाय. कदम यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
२५ कोडोली वसुली
फोटो ओळ
थकित करवसुली वेळी ग्रामपंचायत सदस्य व मिळकतदार यांच्यात वादाप्रसंगी उपस्थित सदस्य.