इचलकरंजी : जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केलेल्या ५०० रुपयांपेक्षा जास्त वाढ देण्यास तयार असलेल्या कारखानदारांबरोबर कामगारांनी चर्चा करावी. त्यांच्यात ठरलेला तोडगा कामगार संघटनेला कळवावा आणि कारखानदार, कामगार व संघटना यांच्यात बोलणी झाल्यानंतरच सायझिंग कारखाने चालू करावेत. अन्यत्र मात्र उच्च न्यायालयाच्या निकालाला अधीन राहून बेमुदत संप सुरूच राहील, अशी घोषणा सायझिंग-वार्पिंग कामगारांच्या मेळाव्यात कामगार नेते ए. बी. पाटील यांनी केली.येथील राजीव गांधी सांस्कृतिक भवनात काल, शनिवारी जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी घेतलेल्या बैठकीनंतर कामगार संघटनेने थोरात चौकात कामगारांचा रविवारी मेळावा आयोजित केला होता. पाटील म्हणाले, २७ वर्षे जाहीर न झालेले सन २०१३ मधील किमान वेतनाचे ड्राफ्ट नोटिफिकेशन सरकारने दाबून ठेवले होते; पण लाल बावटा सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून बडगा उगारताच सुधारित किमान वेतन बाहेर आले. सरकारनेच जाहीर केलेल्या किमान वेतनाच्या अंमलबजावणीसाठी कामगारांनी संप केला आहे. सायझिंगधारक आमच्याशी चर्चाच करीत नाहीत. आम्ही चर्चेसाठी केव्हाही तयार आहोत. कालच्या बैठकीत काही मोजकेच वगळता बाकी सर्व कामगार संघटनेवर दबाव टाकण्यासाठीच आले होते. त्यांच्याकडून संप मागे घ्या आणि गाव चालू करूया, असा वारंवार आग्रह होता, असाही आरोप केला. या मेळाव्यात आनंदराव चव्हाण, सुभाष निकम, मनोहर ढवळे, आदींची भाषणे झाली.(प्रतिनिधी)कामगाराचा मालक आणि ‘काडीपेटी’आम्ही कामगारांचे मालक झालोय, असे म्हणणाऱ्या सायझिंग मालकाच्या पुढाऱ्याने लक्षात ठेवावे की, भले कामगाराचा मालक झाला की त्याची नीती बदलते आणि तो मालक पिळवणूक करूनच मोठा होतो, अशी टीका पाटील यांनी केली. तर एक मालक पुढारी तर खिशातून ‘काडीपेटी’ घेऊनच फिरतोय, अशी खिल्ली उडवित तो जाईल तिथे काडी ओढून पेटवित सुटतोय, असे त्यांनी म्हटले.
पाचशे वाढ देणाऱ्यांबरोबर चर्चा करा
By admin | Updated: September 7, 2015 00:14 IST