कोल्हापूर/सावरवाडी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक, निवृत्ती तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सुरेश रघुनाथराव पाटील (वय ५८, कसबा बीड, ता. करवीर) हे शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास कसबा बीड ते महे दरम्यानच्या पुलाच्या कठड्यावर स्कॉर्पिओ गाडी आदळून झालेल्या अपघातात जागीच ठार झाले. गडहिंग्लज येथून मुलीकडून महालक्ष्मी यात्रेनिमित्त जेवून येताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. पत्नी उषा (५०), मुलगा सत्यजित (३०), सून रेवती (२४) गंभीर जखमी असून, नात स्नेहा (९) ही किरकोळ जखमी आहे. या सर्वांवर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कन्या दीपाली संग्राम कदम (गडहिंग्लज) यांच्याकडे महालक्ष्मी यात्रेनिमित्त जेवण्यासाठी सुरेश पाटील कुटुंबीयांसह शुक्रवारी दुपारी गेले होते. जेवण करून रात्री कुटुंबीयांसह ते स्वत:च्या स्कॉर्पिओ (एमएच ०९-९२९२) मधून गावाकडे परतत होते. मुलगा सत्यजित गाडी चालवीत होता. पाटील पुलाच्या कठड्यावर स्कॉर्पिओ गाडी जोरात आदळून सुमारे दहा फूट खाली नदीपात्रात पडली. गाडीचा वेग इतका प्रचंड होता की, धरणाचा कठडा तुटून गाडी दोनवेळा उलटली. कसबा बीडमधील नागेश आंबी व सर्जेराव गावडे हे एम. आय. डी. सी.मधून कामावरून घरी येताना त्यांनी हा अपघात पाहिला. त्यांनी गाडीचा क्रमांक पाहून तत्काळ गावात जाऊन गावकऱ्यांना उठविले. गावकऱ्यांनी घटनास्थळी येऊन जखमींना बाहेर काढले. यामध्ये पाटील यांच्या कपाळात पुलाच्या संरक्षक कठड्याची लोखंडी कांब घुसून डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना खासगी रुग्णालयात आणले. पाटील यांच्या पत्नी उषा यांच्या दोन्ही पायांना जबर मार बसला आहे. सून रेवती यांच्या हनुवटीला मार बसला आहे. मुलगा सत्यजितच्या बरगड्या तुटल्या आहेत. पाटील यांच्या मृत्यूची बातमी कोल्हापूर शहरासह जिल्'ात वाऱ्यासारखी पसरली. सकाळी सहापासूनच त्यांच्या कसबा बीड येथील निवासस्थानी नातेवाईक, मित्र, विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांची रीघ लागली. सीपीआर रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सकाळी नऊ वाजता पाटील यांचा मृतदेह गावी आणण्यात आला. पाटील यांच्या आई तुळजापूरला मुलीकडे गेल्या होत्या. त्या व पाटील यांच्या बहीण सकाळी अकरा वाजता आल्यानंतर त्यांनी मृतदेह पाहून एकच आक्रोश केला. गावातून अंत्ययात्रा काढून साडेअकरा वाजता त्यांची कन्या दीपाली यांनी त्यांच्या पार्थिवास भडाग्नी दिला. रक्षाविसर्जन उद्या, सोमवारी आहे. यावेळी आमदार महादेवराव महाडिक, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार वैभव नाईक, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार संजय घाटगे, माजी खासदार निवेदिता माने, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत, भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष धैर्यशील पाटील-कौलवकर, जिल्हा बॅँकेचे संचालक ए. वाय. पाटील, व्ही. बी. पाटील, कागल पंचायत समितीचे उपसभापती भूषण पाटील, ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, अरुण नरके, रवींद्र आपटे, राजेश नरसिंग पाटील, बाळासाहेब खाडे, चंद्रकांत बोंद्रे, पी. डी. धुंदरे, उदय पाटील, दीपक पाटील, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य पुंडलिक पाटील, टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे, कुंभी-कासारी बॅँकेचे अध्यक्ष अजित नरके, यशवंत बॅँकेचे अध्यक्ष अॅड. प्रकाश देसाई, शंकरराव पाटील-शिंगणापूरकर, चेंबर आॅफ कॉमर्सचे आनंद माने, नगरसेवक इंद्रजित सलगर, गणी आजरेकर, मधुकर जांभळे, संभाजीराव पाटील-कुडित्रेकर, हिंदुराव चौगले, अॅड. शिवाजीराव राणे, बाबासाहेब देवकर, करवीरचे माजी सभापती रवींद्र मडके, बाजार समितीचे माजी उपसभापती शामराव सूर्यवंशी, ‘कुंभी’चे माजी अध्यक्ष नामदेव गावडे, सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, ‘कुंभी’चे उपाध्यक्ष शामराव गोदडे, ‘भोगावती’ व ‘कुंभी’चे संचालक व माजी संचालक, आदी उपस्थित होते. शालीन स्वभावाने लोकप्रियता वीस वर्षे तालुका संघाचे चेअरमन, बारा वर्षे ‘गोकुळ’चे संचालक अशी सत्तेची पदे असतानाही त्यांनी फारसे कोणाला दुखावले नाही. त्यांच्या शालीन स्वभावाने ‘गोकुळ’मध्येही संचालकांसह अधिकाऱ्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजताच ‘गोकुळ’च्या कर्मचाऱ्यांनी मुख्य प्रकल्पासह सर्व शाखांवर शोकसभा घेतली. त्यानंतर दिवसभरासाठी कामकाज बंद ठेवून पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. ...अन् डिजिटल उतरविले पंधरा दिवसांपूर्वी ‘गोकुळ’च्या निवडणुकीत सुरेश पाटील चांगल्या मताधिक्याने तिसऱ्यांदा विजयी झाले होते. त्यामुळे परिसरात त्यांच्या अभिनंदनाचे डिजिटल फलक झळकत होते; पण त्यांच्या अपघाती मृत्यूची बातमी समजताच परिसरातील डिजिटल फलक उतरविले गेले. सत्यजित यांचा तिसरा अपघात! पाटील यांचे सुपुत्र सत्यजित हे बेफाम गाडी चालवितात. यापूर्वी झालेल्या अपघातांत त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर इजा झाली होती. तरीही त्यांचा गाडीचा वेग कमी झाला नसल्याची चर्चा सुरू होती. काळोख अन् स्नेहाचा आरडाओरडा अपघातात पाटील यांचे कुटुंबीय गंभीर जखमी झाले; पण त्यांच्या मुलगीची मुलगी स्नेहा संग्राम कदम हिचा केवळ डावा हात मोडला. अपघात झाल्यानंतर काळोखात भेदरून ती ‘वाचवा वाचवा’ म्हणून आरडाओरडा करीत होती. दीड वर्षात तिसऱ्या संचालकाचा मृत्यू ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक आनंदराव पाटील-चुयेकर, राजकुमार हत्तरकी यांच्या निधनाला अजून वर्ष व्हायचे आहे. तोपर्यंत सुरेश पाटील यांचा अपघाती मृत्यू झाल्याची चर्चा घटनास्थळी होती. अध्यक्षपदाचे स्वप्न अपूर्णच सुरेश पाटील ‘गोकुळ’मध्ये तिसऱ्यांदा निवडून आल्याने अध्यक्षपदाचे तेच सर्वात प्रबळ दावेदार होते; पण सुरेश पाटील यांना म्हणजे पर्यायाने पी.एन.पाटील यांना रोखण्यासाठी नाट्यपूर्ण घडामोडीं झाल्या व त्यातून पाटील यांचे नाव ऐनवेळी मागे पडले. त्यामुळे त्यांचे अध्यक्षपदाचे स्वप्न मात्र अपूर्णच राहिल्याची चर्चा सुरू होती. सुरेश पाटील यांची राजकीय कारकिर्द दत्त विकास संस्था, राधाकृष्ण विकास व जोतिर्लिंग दूध संस्थेचे संस्थापक १९९१ ला निवृत्ती तालुका खरेदी-विक्रीचे संचालक १९९५ ते आजतागायत चेअरमन २००३ - ‘गोकुळ’ दूध संघाच्या संचालकपदी निवड २००३, २००८ व २०१५ मध्ये सलग तिसऱ्यांदा संचालक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते
‘गोकुळ’चे संचालक सुरेश पाटील यांचे अपघाती निधन
By admin | Updated: May 10, 2015 01:16 IST